ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे प्रतिपादन : आजऱ्यात लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कार वितरण सोहळा
प्रतिनिधी /आजरा
कर्नाटक सरकारच्या धोरणामुळे सीमाभागातील मराठी भाषा आणि संस्कृतीचा ऱ्हास होत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी केले. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व सीमालढ्याचे नेते कॉ. कृष्णा मेणसे यांना आजरा येथे प्रदान करण्यात आलेल्या लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष रवींद्र आपटे होते. आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मृती समितीचे सदस्य मुकुंदराव देसाई यांनी स्वागत केले. कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई यांनी प्रास्ताविक केले. यानंतर डॉ. पवार यांच्या हस्ते कॉ. मेणसे यांना लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मृती पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी डॉ. पवार म्हणाले, सीमाभागातील मराठी भाषिकांची होत असलेली गळचेपी भयानक आहे. कर्नाटक शासन जाणीवपूर्वक सीमाभागातील मराठी भाषा व संस्कृती नष्ट करू पाहत आहे. ती टिकविण्यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घेतला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. लोकशाहीर गव्हाणकरांचे सीमालढ्यातील योगदान मोठे असून त्यांच्या स्मृती आजरेकरांनी चिरंतन जपाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
यानंतर आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आबिटकर यांनी मनोगतांतून लोकशाहीर गव्हाणकरांचे कार्य पुढच्या पिढीला समजावून सांगण्याची गरज असल्याचे सांगितले. या समितीच्या माध्यमातून हे काम होत राहील, अशी अपेक्षा व्यक्त करून समितीला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
पुरस्काराने कृष्णा मेणसे भारावले
सत्काराला उत्तर देताना कॉ. मेणसे म्हणाले, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, अमर शेख आणि द. ना. गव्हाणकर यांच्यासोबत काम करण्याचे भाग्य आपल्याला लाभले. शाळा सोडून वर्धा येथे महात्मा गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात दाखल झालो. देशासाठी काही तरी केले पाहिजे, असे आपल्याला शालेय जीवनापासून वाटत होते. त्यामुळे स्वातंत्र्यलढ्यात आणि त्यानंतर मिळालेल्या स्वराज्याचे सुराज्य व्हावे यासाठी काम करत राहिल्याचे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यलढा आणि सीमालढ्यासाठी 11 महिन्यांचा तुऊंगवास भोगल्याचे त्यांनी सांगितले. सीमालढ्यातील अग्रणी असलेल्या व ज्यांच्या सोबत काम केले त्या शाहीर गव्हाणकर यांच्या नावे मिळालेल्या पुरस्काराने आपण भारावून गेल्याचे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात आपटे यांनी स्मृती पुरस्कार समितीच्या कार्याची माहिती दिली. महागोंड या त्यांच्या मूळ गावी शाहीर गव्हाणकर व बाबुराव पेंटर यांचे यथोचित स्मारक व्हावे यासाठी समिती ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला माजी आमदार श्रीपतराव शिंदे, डॉ. शमशुद्दीन तांबोळी, प्राचार्य आनंद मेणसे, पुरस्कार समितीचे उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, आजरा कारखान्याचे चेअरमन सुनील शिंत्रे, उपनगराध्यक्षा अस्मिता जाधव, माजी सभापती अल्बर्ट डिसोझा, रचना होलम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. अनिकेत चराटी यांनी आभार मानले.
पुरस्काराची रक्कम समितीकडे सुपूर्द
लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कार समितीकडून देण्यात आलेल्या 10 हजारांच्या पुरस्काराच्या रकमेचा धनादेश कॉ. कृष्णा मेणसे यांनी पुरस्कार व स्मारक समितीकडे सुपूर्द केला. डॉ. पवार यांनीही समितीला 5 हजार ऊपयांची देणगी जाहीर केली.