प्रतिनिधी/ बेळगाव
सार्वजनिक वाचनालयातर्फे मराठी भाषा दिनानिमित्त ‘मराठी भाषा परीचर्चा’ आयोजित करण्यात आली आहे. अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष अनंत लाड होते. चर्चासत्राचे संचलन डॉ. विनोद गायकवाड यांनी केले.
या सत्रात शैला मत्तीकोप्प म्हणाल्या, शिक्षकाने जातीबाहेर पडले पाहिजे. पूर्वी अनेक शिक्षक आदर्श व त्यागमूर्ती असे. अभ्यासासाठी मराठीतील श्रेष्ठ लेखकांचे साहित्य असे. पाठांतरावर भर होता. ती मराठी प्रदुषणमुक्त होती. आज अकारण इतर भाषांमधील शब्द आपण भाषेत घुसडतो आहोत.
प्रा. मनीषा नेसरकर यांनी, मराठी संपणार आहे, असे बिनबुडाचे अंदाज बांधण्याची गरज नाही. ती ज्ञानेश्वर, तुकाराम व शिवरायांची आहे. तिला काही होणार नसून नकारार्थी मानसिकतेतून बाहेर या. ती मृदू आणि मधूर आहे तशीच ती सक्षम आहे, असे सांगितले. एसएनडीटी विद्यापीठाच्या डॉ. प्राजक्ता गडकरी यांनी, मुलांचा विकास हा मातृभाषेमुळे अधिक होतो. जेथे जेथे शक्य आहे तेथे मराठीच बोलावे. बाळ गर्भशयापासूनच मातृभाषेचे संस्कार ग्रहण करत असते, असे सांगितले. यावेळी निवेदिका मनीषा सन्ननाईक यांनीही मत व्यक्त केले.
यानंतरच्या चर्चेत गिरीश जोशी, प्रा. अशोक अलगोंडी, प्रा. वाय. पी. नाईक, चंद्रशेखर गायकवाड, नेताजी जाधव, रोशनी हुंद्रे, अभय याळगी, अंजली नाडगौडा, वर्षा कुलकर्णी आदींनी भाग घेतला. अनंत लाड यांनी अध्यक्षीय समारोप केला. यावेळी संचालक अॅड. आय. जी. मुचंडी, नेताजी जाधव, लता पाटील, सुलभा हेरेकर, अॅड. अमर येळ्ळूरकर, विठ्ठल कडगावकर उपस्थित होते.