लोकसभेत मांडल्या सीमावासीयांच्या व्यथा; पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मध्यस्थी करण्याची मागणी
कोल्हापूर प्रतिनिधी
कर्नाटक सरकारच्या दडपशाहीमुळे सीमाभागातील मराठी माणूस दहशतीखाली आहे. येथील वातावरण भयमुक्त होण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची तातडीने बैठक घेवून तोडगा काढावा, अशी मागणी सीमाप्रश्न विषयक तज्ञ समितीचे अध्यक्ष तथा खासदार धैर्यशील माने यांनी शुक्रवारी संसदेत केली.
सीमाभागात तणावाचे वातावरण आहे. कन्नड रक्षक वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक करुन मराठी माणसांवर दहशत माजवली. गेल्या चार दिवसांपासून कर्नाटकात सुरू असलेल्या या प्रकरणाचे पडसाद शुक्रवारी संसदेत उमटले. खासदार माने यांनी सीमाभागात सुरू असलेल्या अन्यायाला लोकसभेच्या कामकाजात वाचा फोडली. ते म्हणाले, सीमाभागात कर्नाटक सरकार पुरस्कृत मराठी माणसांवर दहशत सुरू आहे. येथील जनता भीतीच्या छायेखाली आहे. एकाबाजूला सीमाप्रश्नी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला असताना कर्नाटकात दहशत माजवून वातावरण अशांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे प्रकार थांबवणे आवश्यक आहे. दोन्ही राज्यांमध्ये सौहार्दाचे वातावरण असले पाहिजे. येथील मराठी माणसाला दिलासा देणे आवश्यक आहे. आता केंद्र सरकारनेच दोन्ही राज्यांत समन्वय साधून वातावरण अधिक बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी, त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन राज्याच्या मुख्यमंत्र्यांची लवकरच बैठक बोलवून तोडगा काढावा, असे आवाहनही खासदार माने यांनी यावेळी केले.