वर्गात पावसाचे पाणी, विद्यार्थ्यांचे हाल : शिक्षण खात्याच्या संबंधित अधिकाऱयांनी शाळेची त्वरित पाहणी करण्याची मागणी
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
गेले चार दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे कंग्राळी बुद्रुक येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेतील चार वर्गखोल्यांच्या स्लॅबमधून पाण्याला गळती लागून वर्गखोल्यांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. तसेच चारही वर्गखोल्यांच्या भिंतीनाही तडे गेल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. तेव्हा पुढील अनर्थ घडण्याआधी शिक्षण खात्याच्या संबंधित अधिकाऱयांनी शाळेची त्वरित पाहणी करून विद्यार्थी वर्गाला दिलासा देण्याची मागणी शाळा सुधारणा कमिटी, पालकवर्ग व शिक्षणप्रेमींतून करण्यात येत आहे.
सदर शाळेमध्ये जवळ-जवळ 300 ते 400 विद्यार्थी शिकत आहेत. परंतु शासन मराठी शाळांकडे दुजाभाव करत असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षणप्रेमींतून व्यक्त होत आहेत. बांधकाम करून घेतेवेळी कंत्राटदारांकडून चांगल्या प्रतीचे काम करून घेणे गरजेचे असते. परंतु कंत्राटदारावर कुणाचाही वचक नसल्यामुळे शासनाचा आर्थिक निधी तर वाया जातोच. परंतु शाळा वर्ग चालू असतेवेळी एखादी दुर्दैवी घटना घडली तर याला जबाबदार कोण, अशीही प्रतिक्रिया शिक्षणप्रेमींतून व्यक्त होत आहेत.
पटांगणाला तलावाचे स्वरुप
चार दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे शाळेच्या पटांगणामध्येसुद्धा पाणी साचून तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. बाहेर पाणी जायला वाट नसल्यामुळे सहावीच्या वर्गखोलीत सदर पाणी शिरले आहे. यामुळे या विद्यार्थ्यांना अन्यत्र हलविण्यात आले आहे.
अधिक निधी देण्याची मागणी
सदर शाळेमध्ये शासकीय मदत, माजी विद्यार्थ्यांची मदत, शिक्षणप्रेमी व अन्य देणगीदारांच्या मदतीतून नूतन शाळेचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. गावच्या विस्ताराच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची पटसंख्या 400 हून अधिक होण्याचा अंदाज आहे. तेव्हा सार्वजनिक शिक्षण खात्याच्या संबंधित अधिकाऱयांनी, लोकप्रतिनिधीनी सदर शाळेच्या बांधकामासाठी जास्तीत-जास्त फंड मंजूर करून शाळा लवकर पूर्णत्वास आणण्यासाठी सहकार्य करण्याचीही मागणी शाळा सुधारणा कमिटी, पालकवर्ग व शिक्षणप्रेमींतून करण्यात आली आहे.
चारही वर्गखोल्या धोकादायक
कंग्राळी बुद्रुक सरकारी मराठी शाळेतील सदर चारही वर्गखोल्यांवरील स्लॅबमधून पावसाचे पाणी झिरपून खोल्यांमध्ये साचले आहे. भिंतीनाही तडे गेल्यामुळे शाळा कधी कोसळेल याचा नेम नाही. संभाव्य धोका ओळखून शाळा सुधारणा कमिटी व शिक्षकवर्गाने दुसऱया वर्गखोल्यांमध्ये सदर विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे तास सुरू ठेवले असल्याचे शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष मोहन भैरटकर यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.