प्रतिनिधी /पणजी
राज्यात गणेशोत्सव एकच दिवसावर आल्याने सर्वत्र चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय यंदा कोरोनाचा प्रभावही कमी झाल्याने गणेशचतुर्थी उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. गणेश चतुर्थीसाठी सजावटीपासून ते खाद्यपदार्थांची खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे. सर्वत्र सजावटीचे सामान, लाईट्समुळे बाजारपेठा झगमगू लागल्या आहेत. गणेशोत्सव साजरा करण्याचा उत्साह असला तरी गणेशोत्सवासाठी लागणाऱया साहित्याचे दर चढे असल्याने गोमंतकीयांना महागाईचे चटके बसत आहेत.
सध्या बाजारपेठेत गणेश चतुर्थीसाठी लागणारे सामान मोठय़ा प्रमाणात दाखल झाले आहे. सजावटीचे सामान, विजेच्या रोषणाईचे साहित्य तसेच पर्यावरणपूरक मखरेही उपलब्ध आहेत. पणजीत अष्टमीची फेरी सुरू असल्याने वस्तूंची खरेदी करण्यासाठी पणजी मार्केट संकुलमध्ये सायंकाळच्यावेळी ग्राहक कमी प्रमाणात दिसून येत आहेत. अष्टमीच्या फेरीत गणेश चतुर्थीसाठी लागणारे कपडे, फर्निचर उपलब्ध असल्याने अनेकांची पावले फेरीकडे वळत आहेत. बाजारात आकर्षक सजावटीसाठीचे आकर्षक हार, गणपतीसाठीचे हार उपलब्ध खिशाला परवडत असेल अशा पद्धतीचे सामान खरेदी करण्याकडे गोमंतकीयांचा कल आहे.
गणेश चतुर्थी हा गोमंतकीयांसाठी महत्त्वाचा सण असल्याने या दिवसात ते पूर्णतः शाकाहार पत्करतात. गणेशोत्सवात विविध पदार्थांची रेलचेल गोवेकरांच्या घरात दिसून येते. त्यासाठी भाज्या खरेदी करण्यासाठी सकाळच्या वेळी बाजारपेठेत गर्दी दिसून येत आहे. विशेषतः स्थानिक भाज्या खरेदी करण्याकरिता ग्राहक दिसून आले. गणेशोत्सवात इतर भाज्यांपेक्षा स्थानिक म्हणजेच गावठी भाज्यांना जास्त प्राधान्य दिले जाते. परंतु सध्या सर्वच वस्तू महाग झाल्याने भाज्याही या महागाईच्या झळीतून बाहेर पडलेली नाहीत.
सध्या बाजारात बटाटा 40 रूपये किलो, टॉमेटो 25 रू. किलो, कांदा 30 रूपये किलो, वालपापडी 120 रूपये किलो, कोबी 40 रूपये किलो, कारली 80 रूपये किलो, फ्लॉवर 40 रूपये, गाजर 80 रूपये किलो, भाजीची केळी 100 रूपयाला 4 या दराने विकली जात आहेत. निरफणस 300 ते 400 रूपये या दरात विकला जात आहे. याशिवाय खतखत्यासाठी लागणाऱया भाज्यांना मोठय़ा प्रमाणात मागणी दिसून येत आहे.
गणेश चतुर्थीमुळे ठिकठिकाणी माटोळी बाजार भरला आहे. माटोळी बाजारात निसर्गातील फुले, फळे यांचा मोठय़ा प्रमाणात समावेश केला जातो. पणजीत मार्केटमध्ये दरवर्षीप्रमाणे माटोळी बाजार भरविण्यात आला आहे. परंतु भाज्यांबरोबरच माटोळी बाजारात माटोळीच्या सामानाचेही दर चढेच आहे. वाहतूक खर्च वाढल्याने दहा रूपयांची वाढ काही वस्तूंमध्ये करण्यात आली आहे. सुपारी, केळीचे घड, नारळ, यासारख्या विविध फळफळावळ, फुले, रानटी फळे विक्रीस आली आहेत. गणेश चतुर्थीसाठी लागणारी हरणं ही फुले 100 रूपयाला एक या दराने विकली जात आहे. तसेच केळीचे घड 300 ते 400 या दराने, असोला नारळ आकाराप्रमाणे 50 ते 70 रूपये, आंबाडे 100 रूपयाला 4 या दराने विकला जात आहे. पणजी बाजारात मोठय़ा प्रमाणात माटोळी बाजार भरविण्यात आला असला तरी महाग वस्तू असल्याने खरेदी करण्यात ग्राहकांना गप्प बसावे लागत आहे.
याशिवाय सजावटीसाठी लागणारे साधे हार 180 रूपयांपासून विकले जात आहेत. तसेच बाप्पासाठीचे हारची किंमत 200 रूपयांपासून सुरू आहे. तसेच फटाके, पताकासुद्धा विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. मखर बनविण्यासाठी थर्मोकोल, कागद, विकत घेतले जात आहेत. याशिवाय रेडीमेड थर्मोकोलची मखरेही दुकानात विकली जात आहेत. गौरीसाठीचे सामानही बाजारात दाखल झाले असून ते खरेदी करण्यात महिलावर्ग दिसून येत आहे. सध्या बाजारात गौरीचा फोटो, शृंगारच्या वस्तू पाकिटात उपलब्ध होत असल्याने ते खरेदी करण्यासाठी महिलांना सोपे होत आहे.
गणेशोत्सवात महत्त्वाचा घटक असतो ते म्हणजे पंचखाद्य. पंचखाद्यासाठी लागणाऱया भाताच्या लाहय़ा उपलब्ध झाल्या आहेत. गोव्यात आरती झाल्यानंतर करंजी आणि पंचखाद्य दिले जाते. त्यामुळे या भाताच्या लाहय़ा न चुकता महिलावर्ग खरेदी करताना दिसत आहे. बाजारात तसेच दुकानात, सहकार भांडार दालने, गोवा बागायतदार यासारख्य़ा ठिकाणी गणेशोत्सव काळात लागणारे साहित्य खरेदीसाठी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. पूजेसाठी लागणारी फुले, फळे यांच्या दरातही काही प्रमाणात वाढ दिसून येत आहे.