आमदार तथा माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचे गौरवोद्गार : कविता आमोणकर यांच्या मर्मबंधातली ठेव पुस्तकाचे प्रकाशन
मडगाव : लेखिका कविता आमोणकर यांनी पत्रकारितेतील आपले स्थान पक्के केले आहे. त्यांचे साहित्यातील योगदानही उल्लेखनीय आहे. त्यांचे गोव्याप्रती असलेले प्रेम, गोव्याची खाद्यसंस्कृती, नातेसंबंधांतील दृढता हे सकारात्मक विचार आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. कविता आमोणकर या लेखिका, पत्रकार असून त्या एक चांगल्या व्यक्ती आहेत. त्यांची ही मर्मबंधातली ठेव म्हणजे जिव्हाळ्याचे भावबंध आहेत, असे गौरवोद्गार मडगाव आमदार दिगंबर कामत यांनी केले. रवींद्र भवन मडगाव येथील कृष्ण कक्षात आयोजित करण्यात आलेल्या लेखिका, पत्रकार कविता आमोणकर यांच्या ’ मर्मबंधातली ठेव ’ या ललित लेखसंग्रहाच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात दिगंबर कामत मुख्य पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सन्माननीय पाहुणे म्हणून ज्येष्ठ समीक्षक, साहित्यिक डॉ. सोमनाथ कोमरपंत, प्रमुख वत्ते म्हणून चौगुले महाविद्यालयाचे मराठी विभागाचे माजी प्रमुख व निवृत्त प्राध्यापक प्रा. श्रीकृष्ण अडसूळ तसेच विशेष निमंत्रित म्हणून चौगुले महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख प्रा. कविता बोरकर आणि साहित्यिक व कवयित्री पूर्णिमा गांवस देसाई तसेच प्रणित आमोणकर यांची उपस्थिती होती.
अभिरुचीसंपन्न लेखन : कोमरपंत
डॉ. सोमनाथ कोमरपंत यांनी साहित्य संमेलनातून मराठी भाषेचा झेंडा फडकत असल्याचे आपल्या भाषणातून सांगितले. मराठी साहित्यातील अनेक आठवणींचा खजिना त्यांनी यावेळी उलगडला. मर्मबंधातली ठेव या पुस्तकातील सर्व लेख हे अभिऊची संपन्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
वाचनीय पुस्तक : अडसूळ
प्रा. श्रीकृष्ण अडसूळ यांनी यावेळेस मर्मबंधातली ठेव या पुस्तकावर भाष्य करताना म्हटले की, गोव्याची खाद्यसंस्कृती जपताना त्यांनी त्यातील अनेक बारकावे टिपून ते आपल्या पुस्तकात मांडले आहेत. त्यांचे शाळेतील प्रेम, शाळेतील मित्र मैत्रिणी, शिक्षक यांच्या सोबत लेखनातील लालित्य त्यांच्या पुस्तकातून पाहायला मिळते. सिंधुताई सकपाळ, भिकू पै आंगले यांच्यासोबत त्यांची आई, बाबा, सासू यांच्या अनेक आठवणी चित्रित करताना त्यांचे रसभरित वर्णन केले आहे, ते संपूर्ण वाचल्याशिवाय पुस्तक हातातून खाली ठेववत नाही. प्रा. कविता बोरकर व पूर्णिमा गांवस देसाई यांनी ही यावेळी आपले विचार मांडले.
मनातील शब्दरत्ने लेखणीतून उतरली : आमोणकर
आपल्या मनोगतात कविता आमोणकर यांनी सांगितले की पत्रकार क्षेत्रात 2004 पासून कार्यरत असताना आलेल्या विविध अनुभवांचा समावेश मर्मबंधातली ठेव या पुस्तकात केला आहे. संत तुकाराम सांगतात की आमच्या घरी शब्दरुपी धन असून हे शब्दच आमची रत्ने आहेत. त्याप्रमाणे माझ्या मनातील शब्दरुपी रत्ने माझ्या लेखणीतून अलगद उतरुन या पुस्तकात शब्दबद्ध झाली आहेत. सुरवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुऊवात करण्यात आली. सूत्रसंचालन अक्षता किनळेकर यांनी केले. आभार कविता आमोणकर यांनी मानले.