संरक्षण सज्जतेस प्रारंभ ः राज्यांना महत्वाचे दिशानिर्देश जारी ः पंतप्रधान मोदींच्या पुढाकाराने उच्चस्तरीय बैठक
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
वाढते तापमान आणि उष्णतेची लाट यांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या एका महत्वपूर्ण उच्चस्तरीय बैठकीत परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. यंदा उन्हाळय़ात तापमान तुलनेने अधिक राहणार असल्याचे अनुमान आहे. त्यामुळे देशाच्या बहुतेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे. या बैठकीत या समस्येवर उपाययोजनांच्या संदर्भात विचार करण्यात आला. तसेच महत्वाचे दिशानिर्देश राज्यांना देण्यात आले.
उन्हाळय़ाच्या दिवसांमध्ये रुग्णालयांमध्ये आग लागण्याच्या प्रमाणात वाढ होत असते. त्यामुळे यंदा तसे होऊ नये म्हणून आधीपासूनच उपाययोजना करण्याची सूचना पंतप्रधान मोदींनी केली. देशभरातील सरकारी रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती नंतर देण्यात आली.
पावसासंबंधी माहिती
भारतीय हवामान विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱयांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुढील काही महिन्यांच्या हवामानविषयक अनुमानाची माहिती देण्यात आली. यंदाचा मान्सून कसा असेल याचे अनुमानही त्यांच्याकडे स्पष्ट करण्यात आले. रबी पिकांवर होऊ शकणारा हवामानाचा परिणाम आणि इतर हवामानविषयक महत्वाची माहितीही त्यांना देण्यात आली. महत्वाच्या पिकांसंबंधीचे अनुमान आणि पिकांचे प्रमाण यंदाच्या रबी हंगामात किती असेल, ही माहितीही देण्यात आली.
चारा आणि पिण्याचे पाणी
जलसिंचन, शेतजमिनीला पाणीपुरवठा, चारापुरवठा आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अशा विविध महत्वाच्या मुद्दय़ावर बैठकीत चर्चा करण्यात आली. सध्या देशात नव्या प्रकारच्या फ्लूचा उद्रेक झाला आहे. त्या संदर्भात रुग्णालयांची उपचार सज्जता आणि राज्यांची या संदर्भातील सज्जता यासंबंधीही विचारविमर्श झाला. औषधांचा पुरवठा, तसेच आपत्कालीन उपाययोजना करण्यासंबंधीची सज्ज्ता यांचाही आढावा या बेठकीत घेण्यात आला, अशी माहिती देण्यात आली.
उष्णतेच्या लाटांपासून संरक्षण
यंदा मोठय़ा प्रमाणावर उष्णतेच्या लाटांची समस्या उद्भवणार आहे. त्या दृष्टीने केंद्र सरकारने राज्य सरकारांना सूचना दिल्या आहेत. तसेच उष्णतेच्या लाटांपासून संरक्षणासाठी तातडीच्या उपाययोजनांची सज्ज्ता ठेवण्याच्या सूचना राज्यांना करण्यात आल्या आहेत. त्यांच्या तयारीवर केंद्राचे लक्ष आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग
हवामानाच्या स्थितीची माहिती सर्व नागरिकांपर्यंत त्यांच्या समजू शकेल अशा भाषेत पोहचावी, यासाठी इंटरनेट, समाजमाध्यमे आदी आधुनिक साधनांचा उपयोग जास्तीत जास्त प्रमाणात करण्यात यावा, अशी सूचना पंतप्रधान मोदी यांनी केली. हवामानाची माहिती नित्यनेमाने नागरिक, ग्रामपंचायत आणि नगरपालिका अधिकारी, त्यांचे पदाधिकारी, आपत्कालीन सहाय्यता दले, अग्निशमन दले तसेच सर्व संबंधितांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. मल्टिमिडियाच्या माध्यमातून या संदर्भात लघु व्याख्याने आणि कार्यक्रम प्रसारित करण्यात यावेत. सर्व स्तरांमधून सज्ज्ता ठेवण्यात यावी, यासाठी आवश्यक त्या योजना करण्याचे ठरविण्यात आले.
काय करावे, काय करु नये
उष्णतेच्या लाटांपासून आपले आणि कुटुंबियांचे, विशेषतः लहान मुलांचे संरक्षण करण्यासाठी लोकांनी कोणते उपाय त्यांच्या पातळीवर करावेत, याची माहिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वसामान्यांनी काय करावे आणि काय टाळावे, याची माहिती सरकारच्या पातळीवर त्यांना सोप्या भाषेत देण्याचा निर्णय घेण्यात आला. जिंगल्स, लघुचित्रपट, बोधपट, माहितीपट, माहिती पत्रके, पँपलेटस्, भित्तीपत्रके आदींच्या साहाय्याने आरोग्यविषयक समाजप्रबोधन आणि जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला, असेही नंतर स्पष्ट करण्यात आले.
रुग्णालयांवर विशेष लक्ष
देशभरातील रुग्णालयांच्या स्थितीवर आणि त्यांच्या सज्जतेवर विशेष लक्ष देण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला. त्वरित सर्व सार्वजनिक रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचा आदेशही लवकरच देण्यात येणार आहे. खासगी रुग्णालयांनाहीं सज्ज राहण्याचा आदेश देण्यात येणार आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सचिव, केंदीय मंत्रिमंडळ सचिव, गृह सचिव, आरोग्य काणि गुटुंब कल्याण विभाग सचिव, कृषी विभाग आणि शेतकरी कल्याण सचिव, भूविज्ञान विभाग सचिव, आपत्तीनिवारण दलांचे अधिकारी इत्यादी उपस्थित होते.