आपल्या अपत्याला शाळेत पाठवण्याची वेळ जवळ येताच पालकांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे कोणत्या ‘मीडियम’च्या शाळेत नाव घालायचे! याचे खरे उत्तर ‘घरामध्ये जी भाषा बोलली जाते त्या माध्यमाच्या शाळेत प्राथमिक शिक्षण’ असे आहे. परंतु तसे घडत नाही. मुला-मुलीच्या शिक्षणासाठी काहीही करू, पण इंग्रजी मीडियममध्ये शिकवू अशी अनेक पालकांची धारणा असते. सातारा जिह्यातील वाई गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्रामपंचायतीच्या बालवाडीमध्ये नुकताच प्रवेश घेतलेल्या मुलांबरोबर संवाद साधला, तेव्हा लक्षात आले की काही मुले-मुली कोणतेही शब्द तोडक्या-मोडक्या इंग्रजीमध्ये बोलतात. कुत्र्याचे चित्र दाखवल्यावर “डॉग’’ म्हणतात. मुलांचा दिनक्रम त्यांच्या भाषेत विचारला तर उत्तर मिळते, “रोज सकाळी मी मिल्क पितो’’. वाघाचे चित्र बघताच “टायगर’’म्हणतात. त्या मुलांच्या वयाचा विचार करता, ‘वाघ’ हा उच्चार करणे अधिक योग्य आहे परंतु मुले ‘तायगल’ असा उच्चार करतात. आईला मम्मी आणि वडिलांना पप्पा म्हणायला शिकवल्यामुळे आपण पुढारलेले असतो, असा काही पालकांचा समज असतो. यावर त्यांच्या पालकांशी संवाद साधल्यानंतर समजले की, त्या पालकांमध्ये मुलांना इंग्रजी शिकवण्याचे ‘भयंकर’ आकर्षण आहे. त्यामुळे घरामधील सर्व संभाषण मराठीमध्ये होत असले तरीही लहान मुलांशी बोलताना पालक अचानक इंग्रजी शब्दांचा वापर करतात. त्यामुळे ही बालके गोंधळलेली असतात. मातृभाषेतील शब्द-वाक्यांची ओळख न होताच इंग्रजी शब्द कानावर पडण्यास सुरुवात झाल्यानंतर ही मुले एक संपूर्ण वाक्य मराठीत बोलू शकत नाहीत आणि इंग्रजीत तर नाहीच नाही. महाराष्ट्रातील अनेक गावामध्ये-शहरामध्ये अशीच परिस्थिती आहे. यावर उपाय म्हणजे बालवाडीपासून किमान पाचवीपर्यंत पूर्ण शिक्षण मातृभाषेमध्ये होणे गरजेचे आहे, ज्यामध्ये इंग्रजी हा विषय अभ्यासाला असू शकतो. परंतु मराठी माध्यमातील शाळा आहेत का?
मराठी माध्यमाच्या शाळांचे प्रमाण कमी झाले आहे, अनेक शाळांनी सेमी-इंग्लिश आणि इंग्लिश मीडियम शाळा सुरु केल्या आहेत आणि पूर्ण मराठी माध्यमातील शाळा बंद होत आहेत. ज्या शाळांत या दोन्ही माध्यमात शिकण्याची सोय आहे त्या शाळांमध्ये इंग्लिश मीडियमच्या तुलनेत सेमी-इंग्लिश माध्यमातील विद्यार्थ्याना दुय्यम दर्जाची वागणूक मिळते, हा एक वेगळाच प्रश्न आहे. सेमी इंग्लिश म्हणजे इंग्रजी व्यतिरिक्त गणित आणि शास्त्र हे विषय इंग्रजीमधून शिकणे (आणि हुशार असल्याची शिक्षा म्हणून संस्कृत ही भाषा शिकून पाठांतराची सवय लावून घेणे). सायन्स इंग्रजीमधून शिकणे ही कल्पना उत्तम असली तरीही आठवीपासून शास्त्राचे धडे इंग्रजीमधून वाचन करण्यापूर्वी इंग्रजी वाचन उत्तम येणे गरजेचे असते हे गृहीत आहे. परंतु शाळांमधील परिस्थिती काय आहे? आठवीपर्यंत कोणत्याही परीक्षेविना विद्यार्थ्याना पास करण्याची क्रूर प्रथा महाराष्ट्रात सुरु असल्यामुळे विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे योग्यरीत्या मूल्यमापन होत नाही. त्यामुळे इंग्रजी वाचन न करता येणारे विद्यार्थी आठवीमध्ये प्रवेश घेतात. ज्यांना इंग्रजीचे धडे वाचून समजत नाहीत त्यांना शास्त्र हा विषय इंग्रजीमधून शिकावा लागतो. यावर अनेक शाळांमधील शिक्षकांनी एक भन्नाट उपाय शोधला आहे. शास्त्राची पुस्तके इंग्रजीमध्ये असली तरीही शिक्षक मराठीमध्ये समजावून सांगतात त्यामुळे रोगापेक्षा इलाज भयंकर या तत्वानुसार परीक्षेत इंग्रजीमध्ये उत्तरे लिहिणे कठीण जाते. (पुण्याजवळच्या गावातल्या इंजिनिअरींग कॉलेजमध्ये सर्व विषय मराठीतून शिकवले जातात पण इंग्रजीमधून उत्तरे लिहायला शिकवले जात नाही). शास्त्रामधील शब्द शब्दावली इंग्रजीमधून वाचणे, त्याचे मराठीमध्ये भाषांतर करून ते समजून घेणे आणि उत्तरे इंग्रजीमध्ये लिहिणे हा द्राविडी प्राणायाम होतो. त्यामुळे अनेक शाळांमधील सेमी-इंग्लिश माध्यमातील विद्यार्थ्यांना मी जेव्हा विचारतो, ‘तुम्हाला न आवडणारा विषय कोणता?’ यावर एकमुखाने एकच उत्तर येते “सायन्स’’. ही भीती घालवण्यासाठी उपाय शास्त्र या विषयावर न करता इंग्रजी विषयावर करणे गरजेचे आहे. यकृत, प्लीहा, आंत्रपुच्छ अशा अगम्य भाषेत शास्त्र हा विषय शिकणे गैर आहे, त्याचा महाविद्यालयीन शिक्षणात काहीही उपयोग नाही, हे खरेच. परंतु शास्त्र हा विषय इंग्रजी माध्यमात शिकण्यापूर्वी प्राथमिक शिक्षणातील इंग्रजी भाषा शिकण्या शिकवण्याचे स्वरूप बदलायला हवे. इंग्रजी वाचन वाढवणे, इंग्रजी शब्दसंपदा वाढवणे, इंग्रजीमधून विचार करणे आणि इंग्रजीमधून व्यक्त होणे यापैकी काहीही उमजत नसताना शास्त्र इंग्रजीमध्ये शिकणे/शिकवणे गैर आहे. परंतु अनेक शाळेत या गंभीर प्रश्नावर उपाययोजना करण्याबाबत अजूनही विचार झालेला नाही.
सेमी-इंग्लिश वर्ग सुरु केल्यामुळे शाळांचा काय फायदा होतो याचे उत्तर कदाचित शाळेचे अर्थकारणात सापडू शकेल परंतु या खटाटोपामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान नक्कीच होते. त्यावर इंग्रजी आणि शास्त्र विषयाच्या शिक्षकांनी एकत्र येऊन उपाय शोधण्यावर चर्चा करून एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. उपाययोजना शाळेप्रमाणे भिन्न असेल आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग आवश्यक आहे. परंतु विद्यार्थ्याचे प्रश्न समजून घेऊन त्यावर उपाय शोधणे या प्रक्रियेमध्ये विद्यार्थी कुठेच नसतात. पालकांना आपले पाल्य इंग्रजीमध्ये ‘सायन्स’ शिकतो याचेच कौतुक जास्त असते. शाळेचा गणवेश बदलून टाय घालण्याची प्रथा सुरु केल्यामुळे इंग्रजी चांगले होईल, ही शाळेतील अंधश्रद्धा आहे. इंग्रजी माध्यमात शिकणाऱया विद्यार्थ्यानाही शास्त्र हा विषय अवघड आणि कंटाळवाणा वाटत असेल तर सेमी-इंग्लिशमध्ये परिस्थिती किती भीषण असेल याची कल्पनाच केलेली बरी. ज्या विद्यार्थ्याना इंग्रजीमध्ये एक वाक्य स्वतःच्या विचाराप्रमाणे इंग्रजीमध्ये लिहिता येत नाही ते, सायन्सच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे तीन किंवा पाच वाक्यात इंग्रजीमध्ये कशी लिहिणार? ‘कोमट दुधामध्ये चमचाभर ताक घालून ढवळून रात्री ठेवल्यास सकाळी दही तयार होते’,‘चंद्रावर गुरुत्वाकर्षण कमी असल्यामुळे उंच उडी मारल्यानंतर आपण लगेच जमिनीवर येऊ शकत नाही’ अशी वाक्ये अनेक शाळातील नववीच्या ‘सेमी-इंग्लिश’ विद्यार्थ्याना इंग्रजीमध्ये लिहिता येत नाहीत हे मी अनेक शाळात अनुभवले आहे. शालेय इंग्रजी व्याकरणामध्ये अडकले आहे त्यामुळे विद्यार्थ्याना आपले विचार इंग्रजीमध्ये व्यक्त करता येत नाहीत कारण त्याना भूतकाळ-वर्तमानकाळ-भविष्यकाळातील वाक्ये इंग्रजीमध्ये लिहिता येत नाहीत. ज्या विद्यार्थ्याना इंग्रजीमधील निबंध आणि पत्रे तोंडपाठ करून लिहावयास शिकवलेले असते, ते विद्यार्थी शास्त्र विषयातील कोणत्याही प्रश्नाची उत्तरे पाठांतर केल्याशिवाय लिहू शकत नाहीत. पाठांतर करून शिकलेल्या शास्त्र विषयाचा दहावीनंतर काहीही उपयोग होत नाही.
हा शिक्षण माध्यमाचा प्रश्न सोडवण्यासाठी चौथीपर्यंतचे शिक्षण मातृभाषेमध्ये असावे आणि त्याच्या जोडीला इंग्रजी भाषा, व्याकरणाचे अवडंबर न माजवता शिकवावी. अशी व्यवस्था करणे शक्य नसल्यास मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतानाच इंग्रजीवर प्रभुत्व मिळविण्याचे शिक्षण द्यावे, पाचवीपासून शास्त्र-गणित हे विषय इंग्रजी भाषेमधून शिकविण्यापूर्वी विद्यार्थ्याना इंग्रजीमधून वाक्यरचना करता यावी, मराठीमधून विचार करून त्याचे इंग्रजीत भाषांतर करण्याऐवजी इंग्रजीमधून विचार करण्यास प्रोत्साहन द्यावे, पाठांतर करण्याची सवय सोडविण्यासाठी प्रत्येक शाळेने इंग्रजीमधून वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन करावे.
इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्येच शिकविण्याची पालकांची इच्छा असल्यास पाल्याची मातृभाषा उत्तम होण्यासाठी पालकांनी विशेष प्रयत्न करावेत. त्यामुळे शाळेत जे शिकवले जात नाही, ते पालकांनी घरामध्ये शिकवणे गरजेचे आहे. आपल्या पाल्याला इंग्रजी किंवा सेमी-इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नाव घातल्यावर लगेच पालक जबाबदारीमधून मोकळे होऊ शकत नाहीत. आपल्या घरातील मुला-मुलींना जे जे अवघड जाते ते विषय स्वतः शिकवण्यासाठी वेळ देण्याऐवजी त्याला क्लासला घालण्याची पालकांची मानसिकता असल्यामुळे विद्यार्थ्यांचा मूळ प्रश्न सुटत नाही.
अलीकडे पाठय़पुस्तकाचे वाचन करवून घेण्याचेही क्लासेस सुरु झाले आहेत कारण पालकांकडे आपल्याच मुलांना देण्यासाठी वेळ नाही. विविध विषयांवरील पुस्तके वाचून दाखवणे, त्यानंतर त्यांच्याकडून अशी पुस्तके वाचून घेणे, इंग्रजी-मराठीमध्ये व्यक्त होण्यासाठी योग्य वाक्यरचना करणे अशी कौशल्ये शिकवण्यासाठी पालकांनीच आपल्या पाल्यासाठी वेळ काढला नाही तर पालक सुशिक्षित असल्याचा विद्यार्थ्याना उपयोग काय, हा मोठा प्रश्न आहे.
-सुहास किर्लोस्कर