कसबे डिग्रज/प्रतिनिधी
कसबे डिग्रज येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प अंतर्गत पथदर्शी भूमिगत चर योजनेच्या संदर्भात बैठक पार पडली. यावेळी जेष्ठ नेते आनंदराव नलवडे, अधीक्षक अभियंता बापूसाहेब गाडे उपस्थित होते.
यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्र शासन ८० टक्के व लाभार्थी शेतकरी २० टक्के असे योजनेचे स्वरूप आहे. या प्रकल्पामुळे सच्छिद्र निचरा प्रणाली द्वारे व बंदिस्त चरीद्वारे शेतातील अतिरिक्त पाण्याचा चांगल्या पद्धतीने निचरा होऊन जमिनीत चांगली सुधारणा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या सहभागाची रक्कम लवकर जमा करावी. शेतकरी व अधिकारी यांनी एकत्रित काम करून हा प्रकल्प राबवावा. या क्षारपड प्रकल्पासाठी राजारामबापू कारखान्याचेही सहकार्य लाभणार आहे. यावेळी भाग्यलक्ष्मी पाणीपुरवठा संस्थेने २० टक्के रक्कमेचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी अधिकारी वर्ग, ग्रामपंचायत, पाणीपुरवठा संस्थांचे पदाधिकारी यासह शेतकरी उपस्थित होते.