प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरातील वाहतूक कोंडीची समस्या वाढत आहे. या वाहतूक कोंडीसाठी फक्त पार्किंगची व्यवस्था हे मुख्य कारण नसून अतिक्रमण, अवजड वाहनांचा प्रवेश, बंद सिग्नल यंत्रणा, तसेच प्रलबिंत मागण्या अशी कारणे जबाबदार आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वानी एकत्र येवून तोडगा काढला पाहिजे. असा निर्धार घेत वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी पुढकार घेतला. यामुळे दोन वर्षांनी पुन्हा व्यापारी वर्ग, हॉकर्स संघटनेचे पदाधिकारी, सातारकर नागरिक, नगरपालिका, बांधकाम विभाग, परिवहन महामंडळ सातारा, महावितरण अशा सर्वांची एकत्रित बैठक शिवतेज हॉलवर संपन्न झाली.
सातारा शहरात गेल्या काही वर्षापासून सतत होणारी वाहतूक कोंडी ही फक्त वाहनधारकांसाठी नाही तर सर्वांसाठीच डोकेदुखी ठरत आहे. शहरात पार्किंग ची समस्या चव्हाटय़ावर येवून पडली आहे. पार्किंगसाठी नीट व्यवस्थापन होत नाही. पार्किंग करण्यासाठी शहरातील राजवाडा, पोवईनाका, सभापती निवास, डीसीसी बॅक, आळुचा खड्डा, गांधी मैदान व इतर भागात जागा आहेत. या जागेवर सोयी-सुविधा देवून पे ऍन्ड पार्क ची सोय होवू शकते. असा मुद्दा वाहतूक व्यवस्थापनाच्या अनुशंगाने आयोजित बैठकीत एक मुखाने मांडण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल होते. यावेळी उपविभागीय पोलीस उपअधीक्षक आचंल दलाल, वाहतूक शाखेचे विठ्ठल शेलार ही उपस्थित होते.
बैठकीत व्यापारी वर्गाने समस्यांचे गाऱहाणे मांडायला सूरूवात केली. फक्त पार्किंग नव्हे तर वाढलेले अतिक्रमण हा मुद्दा प्रकर्षाने उपस्थित करण्यात आला. हा मुद्दा उपस्थित होताच नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱयांनी हाताची घडी अन् तोंडावर बोट ठेवले. काही न बोलता फक्त बघ्याची भूमिका घेतली. शहरातील फुटपाथ हा पद्चाऱयासाठी आहे ना असा प्रश्न उपस्थित होताच. किरकोळ विक्रेत्यांवर कोणाचाही वचक नसल्याचे सांगण्यात आले. धूळखात पडलेली सिंग्नल यंत्रणा ही बंदच राहणार का असा सवाल उपस्थित झाला. या बैठकीत सातारा शहरातील सोयी-सुविधांवर भर देण्याची मागणी करण्यात आली.
टेंडर काढण्यात येईल…
शहरातील राजपथ व कर्मवीर पथ येथे सम-विषम तारखेनुसार वाहनांचे पार्किंग करण्यात येते. तरीही वाढती वाहनांची संख्या आणि पार्किंग सोय नसल्याने वाहनधारकांपुढे वाहने पार्किंगची समस्या नेहमी निर्माण होत असते. शहरातील एसटी स्टॅड परिसरात खाजगी पे ऍन्ड पार्किंगची सोय आहे. परंतु इतर भागात ही ही सोय पाहिजे अशी मागणी बैठकीत करण्यात आली. यावेळी पे ऍन्ड पार्किंग चा प्रस्ताव मांडण्यात आला. शहरातील आळुचा खड्डा गुरूवार परज, गांधी मैदान येथे हे पार्किंग नगरपालिकेने सूरू करावे अशी मागणी झाली. यावेळी टेंडर काढण्यात येईल. जे इच्छुक आहेत त्यांनी अर्ज करावा असे नगरपालिकेच्या अधिकाऱयांनी सांगितले.
पैसे घेणार तशा सुविधा ही द्या
पे ऍन्ड पार्क ची सोय ही योग्य आहे. परंतु वाहनधारकांकडून पैसे घेता तशा सुविधाही देण्यात याव्यात. आळुचा खड्डा येथे पावसाळ्याच्या दिवसात चिखल होतो. या चिखलात गाडय़ा कशा उभ्या करायच्या. रात्रीच्या वेळी तिथे लाईची सोय होणार का ? लाईट गेली तर…यामुळे फक्त पैसे घेवू नका तर सुविधाही पुरवण्यात याव्यात हीच मागणी करण्यात आली.
अतिक्रमणावर पालिका मेहरबान का ?
शहरात नजर पडेल तिथे टपऱया, किरकोळ विक्रेते, हातगाडे यांचे अतिक्रमण वाढलेले आहे. राजपथ, सुभाष चंद्र बोस चौक, कर्मवीर पथ मंगळवार तळे येथे भाजी विक्रेते व फळ विक्रेते यांनी विनापरवानगी गाडे उभे करून व्यवसाय थाटला आहे. या व्यवसायामुळे पालिकेचे उत्पन्न वाढत असेल. परंतु यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी सुटत नाही. या विक्रेत्यांना जागा देवूनही हे रस्त्यावर बसत आहेत. याकडे पालिकेने दुर्लक्ष करत मनमानी करभार करण्याची मुभा दिल्याने पालिका यांच्यावर मेहरबान असल्याची चर्चा झाली.
वाहने सेंकदात उचलतात
वाहतूक शाखेचा क्रेन हा लोकांना शिस्त लावण्यासाठी आहे. परंतु हा पेन येताच वाहनधारकांच्या काळजाचा ठोका चुकत आहे. कोणतीही सुचना न करता काही सेंकदात पेनचे कर्मचारी वाहने उचलत आहेत. वयोवृद्ध, महिला यांचा विचारही केला जात नाही. यामुळे हा क्रेन फक्त वसुलीसाठी बनलाय अशी भावना वाहनधारकांच्यात निर्माण होत आहे. याला विरोध केला तर रोज भांडणे होतील. यामुळे पेन वरील कर्मचाऱयांना ही सुचना देण्यात याव्यात.
प्रतिक्रिया–
वाहतूक कोंडीतून मुक्तता व्हावी हा प्रयत्न
सातारा शहरात वाहतूकीचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. यासाठी सर्वांनी एकत्र येवून स्वतःची जबाबदारी ओळखून ती पार पाडली पाहिजे. हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. कोरोना नंतर दोन वर्षांनी जरी ही बैठक पार पडली. तरीही सर्वांचा सहभाग हा नक्की वाहतूक व्यवस्थेवर चांगला परिणाम करून दाखवणार आहे.
विठ्ठल शेलार, पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा
रस्त्यावर ही दुकानदारांचे अतिक्रमण
अतिक्रमण हे फक्त हातगाडे धारकांमुळे होत नाही. तर दुकानदारामुळे ही होत आहे. शहरातील खंडोबा माळ या रस्त्यावरून जाताना तुमच्या लक्षात येईल येथील दुकानदारांनी रस्त्यावर फलक तसेच वाहनांची दुरूस्ती करत आहे. यामुळे इतर वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. यांना नियम कधी लावण्यात येणार आहेत. रस्ता हा कुणाच्याही मालकीचा नाही हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.
प्रकाश गवळी, वाहतूक संघटनेचे अध्यक्ष
आम्ही अधिकृत हॉकर्स आहोत
कोरोना काळात अनेकांना बेरोजगारीचा सामना करावा लागला आहे. यामुळे टपरी मांडून व्यवसाय थाटला जातोय. व्यवसाय करण्यावर आमचा आक्षेप नाही. पण हे अधिकृतरित्या व्यवसाय करत आहेत का ? यांची पाहणी नगरपालिका का करत नाही. फक्त अतिक्रमणाचा विषय निघाला की हॉकर्स ची कारणे पुढे केली जातात. आम्ही अधिकृत हॉकर्स आहोत. नगरपालिकेने जो सर्व्हे केला होता. त्या सर्व्हे आमची पण नावे आहेत. यामुळे आमच्या कोणतीही कारवाई झाली तर आम्ही त्याला विरोध करणार आहोत.