राहुल गांधी अन् जयराम रमेश यांचा सहभाग : अग्निवीर अन् एमएसपीवर देशभरात पक्ष आंदोलन करणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी सर्व महासचिव, प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाच्या राज्य प्रभारींसोबत बैठक घेतली आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी, महासचिव जयराम रमेश आणि के.सी. वेणुगोपाल या बैठकीत सामील झाले. या बैठकीत आगामी महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडसमवेत जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसंबंधी चर्चा झाली. घटक पक्षांसोबतचे जागावाटप, तिकिटवाटप समवेत प्रचारमोहिमेवरून यात विचारविनिमय करण्यात आला.
बेरोजगारी, अग्निवीर, अनियंत्रित महागाई, शेतकरी आणि जातनिहाय जनगणना यासारख्या गंभीर मुद्द्यांना काँग्रेस पक्ष जनतेदरम्यान उपस्थित करणार असून याकरता देशभरात मोहीम सुरू केली जाणार आहे. सेबी आणि अदानी यांच्यातील संबंधांप्रकरणी चौकशीची गरज आहे. शेअरबाजारात छोट्या गुंतवणुकदारांची रक्कम धोक्यात टाकली जाऊ शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्वरित सेबी अध्यक्षांचा राजीनामा मागावा आणि चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करावी असे खर्गे यांनी म्हटले आहे.
जातनिहाय जनगणना लोकांची मागणी
मोदींच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारकडून राज्यघटनेवर अतिक्रमण होत ओ. जातनिहाय जनगणना ही लोकांची मागणी आहे. पिकांना हमीभावासाठी कायदेशीर हमीच्या मागणीसाठी आमचा लढा सुरूच राहणार आहे. अग्निपथ योजना संपुष्टात आणण्याची गरज असल्याचे वक्तव्य खर्गे यांनी केले आहे.
रेल्वेसुरक्षा धोक्यात
बेरोजगारी आणि वाढती महागाई यासारख्या ज्वलंत मुद्द्यांवर आमची नजर आहे. गरीब आणि मध्यमवर्गासोबत विश्वासघात करण्यात आला आहे. तर रेल्वे रुळावरून घसरणे आता सामान्य बाब ठरली आहे. याचबरोबर हवामान बदलसंबंधी आपत्ती तसेच पायाभूत सुविधांचा घसरता स्तर देखील चिंतेचा विषय असल्याचे ते म्हणाले.