प्रतिनिधी/ बेळगाव
येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्यावतीने रविवार दि. 19 रोजी 18 वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्याची मुहूर्तमेढ रोवण्याचा कार्यक्रम शनिवारी पार पडला. परमेश्वरनगर येळ्ळूर येथील मराठी मुलांच्या वाडी शाळेच्या मैदानामध्ये उद्योजक अमर अकणोजी व त्यांच्या पत्नी अमृता अकणोजी यांच्या हस्ते मुहूर्तमेढ रोवण्यात आली.
यावेळी माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, प्रमुख वक्ते म्हणून अॅड. शाम पाटील उपस्थित होते. यावेळी मराठी भाषा व संस्कृती जपण्यासाठी साहित्य संमेलनांची गरज आहे. साहित्य संमेलनांमुळे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य अर्जुन गोरल यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला माजी ता. पं. सदस्य रावजी पाटील, चांगळेश्वरी शिक्षण मंडळाचे संस्थापक वाय. एन. मजुकर, येळ्ळूर ग्रा. पं. अध्यक्ष सतीश पाटील, नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष शिवाजी सायनेकर, तानाजी हलगेकर, मुख्याध्यापक अरुण धामणेकर, मुख्याध्यापिका शोभा निलजकर आदी उपस्थित होते.
विद्यार्थिनींनी ईशस्तवन गायिले. प्रास्ताविक व स्वागत साहित्य संघाचे कार्याध्यक्ष प्रा. सी. एम. गोरल यांनी केले. कार्यक्रमाला येळ्ळूर विभाग म. ए. समितीचे अध्यक्ष शांताराम कुगजी, कार्याध्यक्ष दुद्दाप्पा बागेवाडी, सेक्रेटरी प्रकाश अष्टेकर, उदय जाधव, सन्मित्र सोसायटीचे चेअरमन राजकुमार पाटील, डॉ. सतीश पाटील, प्रसाद मजुकर, ग्रा. पं. सदस्य प्रमोद पाटील, ब्रह्मलिंग सोसायटीचे संस्थापक गोविंद काळसेकर, साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे, सचिव तानाजी पावले, मुख्याध्यापक एम. बी. बाचीकर, रमेश धामणेकर यांच्यासह संघाचे सदस्य उपस्थित होते. मुख्याध्यापक बबन कानशिडे यांनी सूत्रसंचालन केले. परशराम मोटराचे यांनी आभार मानले.