हैदराबादमध्ये पंतप्रधान मोदींची जाहीर सभा
वृत्तसंस्था / हैदराबाद
तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी भाजपच्या जाहीर सभेला संबोधित केले आहे. या सभेत बोलताना मोदींनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना आणि त्यांच्या पक्षाला लक्ष्य केले आहे. ज्या ठिकाणी घराणेशाहीवर चालणारे पक्ष मागे पडतात, तेथे विकास वेगाने होतो. घराणेशाहीयुक्त पक्ष हे लोकशाहीचे शत्रू आहेत. घराणेशाहीमुळे तरुण-तरुणींकडून संधी हिरावून घेतल्या जातात. घराणेशाहीवर आधारित राजकीय पक्ष केवळ स्वतःचे कल्याण इच्छितात, अशा पक्षांचा नारा ‘एक परिवार लगातार’ असा असतो. घराणेशाही तरुणाईच्या स्वप्नांना चिरडणारी असते. घराणेशाहीयुक्त पक्ष केवळ स्वतःची तिजोरी भरत असल्याचे म्हणत मोदींनी केसीआर यांच्या तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षाला लक्ष्य केले आहे.
सभेतील संबोधनादरम्यान मोदींनी घराणेशाहीवरून विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला आहे. घराणेशाहीमुळेच देशाच्या तरुण-तरुणींना, देशातील प्रतोला राजकारणात येण्याची संधी मिळत नाही. घराणेशाही पात्र लोकांच्या स्वप्नांना उधळविणारी ठरते. याचमुळे आता 21 व्या शतकातील भारतासाठी घराणेशाहीपासून मुक्ती, घराणेशाहीयुक्त पक्षांपासून मुक्ती एक संकल्प देखील असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत
एका कुटुंबाला समर्पित पक्ष सत्तेवर आल्यावर त्या कुटुंबातील सदस्य भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा चेहरा ठरत असल्याचे तेलंगणातील जनता पाहत आहे. घराणेशाही असणारे पक्ष केवळ स्वतःचा विकास करतात, स्वतःच्या कुटुंबीयांच्या तिजोऱया भरत असतात. तर घराणेशाहीयुक्त पक्ष सत्तेवर दूर झाल्यावर विकासाचे मार्ग खुले झाल्याचे अनेक ठिकाणी दिसून येते. घराणेशाहीपासून मुक्तीची मोहीम पुढे नेण्याची जबाबदारी आता तेलंगणामधील माझ्या बंधू-भगिनींची असल्याचे मोदी म्हणाले.
दशकांपर्यंत चाललेल्या तेलंगणा आंदोलनात हजारो लोकांनी स्वतःचे बलिदान दिले होते. हे बलिदान तेलंगणाच्या भविष्यासाठी होते. हे बलिदान तेलंगणाच्या गौरवासाठी होते. एका कुटुंबाने तेलंगणाच्या विकासाची ही सातत्याने चिरडून टाकण्यासाठी हे आंदोलन झाले नव्हते असे म्हणत मोदींनी टीआरएसवर टीका केली आहे.
तेलंगणाच्या भूमीवर मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन करतो. योगींना कुणीतरी एका ठिकाणी जाऊ नका असे सांगितले होते. परंतु योगींनी आपण विज्ञानावर ठेवतो असे सांगत त्या ठिकाणचा दौरा केला होता. योगी आता पुन्हा मुख्यमंत्री झाले आहेत. अंधश्रद्धेला बळ देणाऱया लोकांपासून तेलंगणाला आम्हाला वाचवायचे आहे. अंधश्रद्धा बाळगणारे लोक तेलंगणाचा विकास करू शकत नसल्याचे म्हणत मोदींनी केसीआर यांना लक्ष्य केले आहे.
जनतेच्या मनातील स्थान
गरीबातील गरीब व्यक्ती देखील स्वप्ने पाहू शकतो. आमच्या सरकारने गरीबांना पक्की घरं दिली. केंद्र सरकारने शेतकऱयांच्या खात्यांमध्ये मदतनिधी थेट हस्तांतरित केला. विरोधी पक्षांनी कुठल्याही प्रकारचे राजकारण केले तरीही जनतेच्या मनातील आमचे स्थान हटवू शकत नाहीत. विरोधी पक्ष आमच्या सरकारकडून चालविण्यात येणाऱया योजनांची नावे बदलून राजकारण करू पाहत आहे. परंतु आम्ही गरीबांसाठी जगणारे लोक आहोत हे त्यांना माहित नसावे असे उद्गार मोदींनी काढले आहेत.