विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्याकडून भावनिक हाक : सर्व आमदार राजीनामे देऊन म्हादईप्रती निष्ठा सिद्ध करुया
प्रतिनिधी /पणजी
वादग्रस्त काळसा-भंडुरा धरण प्रकल्पाचा डीपीआर केंद्राकडून मंजूर करून घेण्यात कर्नाटकला यश येणे हा त्यांचा मोठा ‘विजय’ असून आता केंद्राच्या या कृत्याचा निषेध करण्यासाठी गोव्यातील सर्वच्या सर्व 40 ही आमदारांनी सामूहिक राजीनामे द्यावे. आई म्हादईची आमच्याकडून बलिदानाची अपेक्षा, असे विधान विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केले आहे.
शुक्रवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, आमदार ऍल्टन डिकॉस्टा आणि आमदार ऍड. कार्लुस फरेरा यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना आलेमाव यांनी, म्हादईचे पाणी वळविण्यापासून कर्नाटकाला रोखण्यात भाजप सरकार सर्वच आघाडय़ांवर अपयशी ठरले आहे, अशी टीका केली.
एकजूट दाखविण्यासाठी हाच पर्याय
अशावेळी आता केंद्राला म्हादई आणि गोव्याबद्दलची आमची बांधिलकी दाखविण्याची वेळ आली असून सत्ताधारी-विरोधक असा राजकीय खेळ खेळ्ण्यात किंवा शब्दांच्या लढाईत वेळ न घालवता सर्व चाळीसही आमदारांनी सामूहिक राजीनामे देण्याची तयारी ठेवावी. केंद्र सरकारला केवळ आकडय़ांवर विश्वास आहे. त्यामुळे आमची एकजुट दाखविण्यासाठी हाच एकमेव पर्याय आहे. तसेच ’आई म्हादई’ चीही आमच्याकडून या बलिदानाची अपेक्षा आहे, असे आलेमाव पुढे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी निष्ठा सिद्ध करावी
मुख्यमंत्री प्रमोद सावंत वारंवार ’म्हादई आपली आई’, असल्याचा उद्घोष करत असतात. कोणत्याही किंमतीत आम्ही तिचे रक्षण करू, अशी आश्वासनेही देत असतात. अशावेळी केंद्राने कर्नाटकाच्या बाजूने दिलेला निर्णय हा स्वतःचा अपमान मानत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा व म्हादईप्रती नि÷ा सिद्ध करावी, असे जाहीर आव्हान आलेमाव यांनी दिले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा अपमान
यापूर्वी 20 मार्च रोजी मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे कर्नाटक सरकारकडून कोणतेही बांधकाम केले जाऊ शकत नाही. तसेच केंद्र सरकारचे सर्व परवाने आणि डीपीआर तयार केल्याशिवाय प्रकल्पाची अंमलबजावणी करता येणार नाही, असे म्हटले होते. परंतु आता डीपीआरला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे, हा सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा अपमान आणि अपयश असल्याचे आलेमाव म्हणाले.
काँग्रेस अध्यक्ष श्री. पाटकर, आमदार डिकॉस्टा आणि फरेरा यांनीही याप्रश्नी आपापली भूमिका यावेळी स्पष्ट केली.
म्हादईसाठी तरी अधिवेशनाचा कालावधी वाढवा
म्हादई नदीचे पाणी वळवण्याचा कर्नाटकचा कोणताही डाव हाणून पाडण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी आवाज उठवला पाहिजे. तसेच याच प्रश्नी विधानसभा अधिवेशनात गांभीर्याने चर्चा होणे आवश्यक असून त्यासाठीतरी सभापतींनी विधानसभा अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, अशी मागणी आलेमाव यांनी केली.