प्रतिनिधी /पणजी
काँग्रेस पक्षाने काल मंगळवारी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची भेट घेऊन भाजप सरकारने दुर्लक्षित केलेल्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्यांवर त्यांचे लक्ष वेधून कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन सादर केले. म्हादई नदीवरील बेकायदेशीर बंधारा बांधकाम स्थळांची पाहणी करण्यासाठी राज्यपालांनी तेथे भेट देण्याची, तूर डाळीच्या नासाडीस जबाबदार माजी नागरी पुरवठामंत्र्यांच्या बरखास्तीची आणि गोव्यातील बेरोजगारीप्रकरणी श्वेतपत्रिका काढण्याचा सरकारला आदेश देण्याची मागणी राज्यपालांकडे केली आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राजभवनात राज्यपालांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसचे कार्याध्यक्ष युरी आलेमाव, वरि÷ उपाध्यक्ष एम.के. शेख, विधीमंडळ गट उपनेते संकल्प आमोणकर, मुख्य प्रतोद ऍड. कार्लोस आल्वारिस फरेरा, आमदार एल्टन डिकॉस्ता आणि रुडॉल्फ फर्नाडिस हजर होते.
राज्यपालांनी प्रत्यक्ष पाहणी करावा
काँग्रेसच्या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की, कर्नाटकने म्हादई खोऱयातील पाणी वळवण्यासाठी बंधाऱयांचे सुरू केलेले बेकायदेशीर बांधकाम आणि गोवा सरकारच्या निष्क्रियतेवर निवेदनात प्रकाश टाकला आहे. राज्यपालांनी गोवा सरकारच्या अधिकाऱयांसह भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घ्यावा. राजकीय पक्ष आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना राज्यपालांनी त्यांच्यासोबत येण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती काँग्रेसने केली आहे.
तूरडाळ, साखरप्रकरणी संबंधितांना बडतर्फ करा
काँग्रेस पक्षाने आपल्या निवेदनात 242 मेट्रिक टन तूरडाळ आणि 10.3 मेट्रिक टन साखर वाया गेल्याच्या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली उच्चस्तरीय चौकशी करण्याची आणि माजी नागरी पुरवठामंत्री आणि यास जबाबदार असलेल्या अधिकाऱयांना तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.
बेरोजगारीवर श्वेतप्रत्रिका काढण्याचा आदेश द्यावा
गोव्यातील वाढत्या बेरोजगारीची टक्केवारी दर्शविणारे विविध अहवाल आणि लाखो नोकऱयांचे आश्वासन देणारी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करणारी विधाने यामुळे राज्यातील विविध तरुण नैराश्यात गेले आहेत, असे निवेदनात नमूद केले आहे. रोजगाराच्या परिस्थितीवर सरकारने श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. कर्मचारी निवड आयोगामार्फत भरती प्रक्रिया हाती घेण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी विनंतीही त्यांनी राज्यपालांना केली आहे.