दलालांनी चिंता करु नये : आंधळी धरणात एका महिन्यात पाणी नेवू शकतो: मला आनंद आहे माझे सरकार आल्याचा : आमदार जयकुमार गोरे यांनी केली ओबीसी आरक्षण मिळाल्याबाबत भूमिका व्यक्त
प्रतिनिधी/सातारा
माण तालुक्यातील म्हसवड येथील एमआयडीसीचा विषय दहा वर्षांपासूनचा आहे. म्हसवड आणि कोरेगावच्या एमआयडीसीची चर्चा झाली होती. प्रत्यक्षात मात्र, म्हसवड येथेच एमआयडीसी होणार आहे. ती म्हसवडमध्ये राहिल, कुठेही जाणार नाही. स्थलांतरीत होणार नाही. दलालांनी त्याची चिंता करु नये, असा दावा आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, मी पक्ष प्रवेश तीन मुद्यावर केला होता. त्यातील म्हसवडच्या एमआयडीसीचा एक मुद्दा होता, असेही त्यांनी सांगितले. आंधळी धरणात एका महिन्यात पाणी नेवू शकतो, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, ओबीसी आरक्षण हे शिंदे आणि फडणवीस यांच्यामुळेच मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, काल सुप्रिम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय आरक्षणाचा दिला आहे. गेली अडीच वर्षात ओबीसी आरक्षणाबाबत ज्या शंका निर्माण झाल्या होत्या. त्या महाविकास आघाडी सरकारने सोडविल्या नाहीत. गेल्या अडीच वर्षात ओबीसी आरक्षण विना निवडणूक झाल्या. अनेकांवर अन्याय झाला. इंपिरियल डाटा सुप्रीम कोर्टाने मागितला होता. तो महाविकास आघाडीने दिला नाही. आरक्षणाशिवाय निवडणूका करण्याचा डाव महाविकास आघाडीचा होता. फडणवीस यांनी सरकार आल्यावर आरक्षण देतो असे बोलले होते. त्यानुसार आरक्षण मिळाले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मी अभिनंदन करतो. पुढे ते म्हणाले, महाविकास आघाडीला अडीच वर्षात काही करता आले नाही. आज तीच लोकं आरक्षण महाविकास आघाडीमुळे मिळाले असा गळा काढत आहेत. ज्या सरकारमध्ये छगन भुजबळ सारखे नेते होते. त्यांनाही आरक्षण देता आले नाही. उलट महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले तशी राज्यावर संकटे आली. ओबीसी समाजाला असुरक्षित भावना निर्माण झाली होती आता त्यास पूर्णविराम मिळाला आहे, असे त्यांनी सांगितले.
म्हसवड येथेच एमआयडीसी होणार
माण तालुक्यातील म्हसवड येथे एमआयडीसी व्हावी यासाठी मी पक्ष बदलला होता. हा प्रश्न दहा वर्षापासूनचा आहे. दिल्ली बंगलोर या रस्त्यासाठी कॅरिडोअर करण्यात आले तेव्हापासूनच एमआयडीसीचा मुद्दा चर्चेत आला. कोरेगावलाही एमआयडीसी झाली पाहिजे. परंतु अशी कोणतीही चर्चा झाली नाही की कोरेगावमध्ये म्हसवडची एमआयडीसी जावी म्हणून. म्हसवडची एमआयडीसी ही म्हसवडमध्ये होणार आहे. कुठल्या ही परिस्थिती स्थलांतरित होणार नाही. अनेकांना स्थलांतरित होते का अशी चिंता दलालांना आहे. हजारों एकर जमीनीचे त्यांना पैसे मिळणार असतील. त्यांनी चिंता करु नये. माण तालुक्याला आमदार आहे खासदार आहे. कसल्याही समित्या स्थापन करताना विचारायला हवे. तालुक्याला आमदार खंबीर आहे, अशीही टीप्पणी त्यांनी केली.
एका महिन्यात आंधळीत पाणी येईल
मी पक्ष प्रवेश तीन अटीवर केला होता. निवडणूकीवेळी पगडी उतरवली होती. त्यानुसार जिहेचे पाणी माण खटावला येणारच. दहा तारखेला टेंडर प्लॅश होईल. शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटेल. आंधळी धरणात एका महिन्यात पाणी येईल. तेही चांगल्या मुहूर्तावर असेही त्यांनी सांगितले.
माझं सरकार आले यातच मी समाधानी
माझं सरकार आले यातच मी समाधानी आहे. मंत्रीपद मिळावे अशी माझी अपेक्षा नाही. ज्या बाबींसाठी आमदारकी लढवली ते साध्य होत आहे, असेही त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, सातारा जिह्यातील नगरपालिकेच्या निवडणूका पक्षीय चिन्हावर लढवाव्यात याकरता लवकरच बैठका होतील. पक्षश्रेष्ठी त्या अनुषंगाने बैठका घेतील, त्या त्यावेळेला हा निर्णय होईल, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. दरम्यान, त्यांनी 100 कोटी रुपयांच्या बदल्यात मंत्रीपद या प्रकरणाबाबत छेडले असता रियाजचा राहुल कुल यांना फोन आला होता. तेव्हा मी शेजारी होतो. मलाही फोन आला होता. वरीष्ठांना तशी कल्पना दिली होती, असेही त्यांनी सांगितले.