पंचायतीने रस्त्यावरील सर्व व्यापाऱ्यांना हटविण्याची अट
वार्ताहर /माशेल
माशेल येथील कदंब बसस्थानवर बांधण्यात आलेल्या सुसज्ज भाजी व मासळी बाजारात अखेर काल मंगळवारी रस्त्यावर मासळीविक्रीसाठी बसणाऱ्या विक्रेत्यांनी स्थलांतर केले. येत्या आठ दिवसात रस्त्यावरील सर्व व्यापाऱ्यांना हटविण्यात यावे अशी अट मासळीविक्री संघटनेतर्फे घालण्यात आल्यानंतर मागील काही महिन्यापासून प्रलंबित असलेल्या स्थलांतरप्रश्नावर तोडगा निघाला. या निर्णर्यामुळे सद्या रस्त्यावर वाहतूकीसाठी वाट मोकळी झालेली आहे. माशेलात रस्त्यावर ठाण मांडणारे फेरीवाले व मासळीविक्रेते वाहतुकीला अडथळा ठरत होते. काल सकाळच्या सुमारास रस्त्यावरील सर्व मासळीविक्रेत्यानी सुसज्ज बांधण्यात आलेल्या नवीन मासळी मार्केटात स्थलांतर करून विक्रीला प्रारंभ केला. सर्व विक्रेत्याची बैठक झाल्यानंतर हा निर्णय घेतल्याची माहिती देवकीकृष्ण मासळी विक्री संघाचे अध्यक्ष उमेश भोसले यांनी दिली. पंचायत मंडळ व व्यापाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत बाजार परिसरात रस्त्यावर कोणत्याही मासळी विक्रेत्याला विक्री करू देऊ नये. मासळी विक्री केवळ स्थलांतरीत करण्यात आलेल्या मासळी बाजरातच व्हावी व पंचायतीने त्यावर देखरेख ठेवावी. पंचायत देखरेख ठेवण्यासाठी कितपत यशस्वी होते यावर सर्वाचे लक्ष लागून राहणार आहे.
दुकानदारांनी व्यापली फुटपाथ, वाहतूकीला अडथळा
मासळी मार्केट ते बार माशेलपर्यंत सपुर्ण रस्त्यावर कित्येक दुकाने फुटपाथवर थाटण्यात आलेली आहे. फुटपाथ व्यापलेल्या दुकानावर पंचायत मंडळ केवळ नावापुरती कारवाई करून दंड ठोठावते. त्यानंतर काही दिवसानी सर्रास फुटपाथ व्यापली जाते. दुचाकीचालकही सामान खरेदी करण्यासाठी रस्त्याच्या मधोमध थांबून वाहतूकीला अडथळा निर्माण करीत असतात. त्यावर वाहतूक पोलीसही कारवाई करताना हतबल दिसतात. रस्त्यावरील दुकानाने सर्व फुटपाथ व्यापल्यानंतर पंचायत मंडळही गप्प का असा सवाल प्रत्येक ग्रामसभेत गाजतो. सर्रास नियमांचे उल्लघन करणाऱ्या व्यापाऱ्याकडे कुठलेच कायदेशीर परवाने नसल्याचेही वारंवार उघड झाले असताना पंचायत वाहतूकीला अडथळा निर्माण करणाऱ्या व्यापाऱ्याना अभय का देते असे संतत्प नागरिकांचे म्हणणे आहे.