रस्त्यावरील नमाजही बंद ः योगी आदित्यनाथ यांची माहिती
लखनौ / वृत्तसंस्था
सध्या मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्यावरून राजकारण तापले असतानाच उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने मशिदीवरील भोंगे खाली उतरवले आहेत. राज्यात आत्तापर्यंत 1 लाख लाऊडस्पीकर प्रार्थनास्थळांवरून खाली उतरवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात लाऊडस्पीकर काढल्यामुळे आता संपूर्ण उत्तर प्रदेशातील आवाज कमी झाला आहे. उत्तर प्रदेश सरकारने हा मुद्दा चांगल्या पद्धतीने हाताळला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लाऊडस्पीकर काढताना कुठेही वाद झालेला नाही. उत्तर प्रदेशातील पोलीस सातत्याने लाऊडस्पीकर विरोधात मोहीम राबवत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दिल्लीतील जहांगीरपुरी येथे धार्मिक भेटीदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लाऊडस्पीकरचा आवाज परिसराबाहेर न जाण्याचे आदेश दिले होते. या आदेशाचे परिणाम दिसू लागले आहेत. अनेक धार्मिक स्थळांवरून लाऊडस्पीकर हटवण्यात आले असून अनेक ठिकाणी छोटय़ा स्पीकरचा वापर सुरू झाला आहे. अतिशय शांतपणे यासंबंधी कार्यवाही सुरू असून राज्यात लाऊडस्पीकरमुळे होणारा आवाज कमी झाल्याचे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
योगी आदित्यनाथ यांनी आणखी एका मुद्यावरून आपल्या सरकारचे कौतुक केले आहे. आम्ही केवळ लाऊडस्पीकरचा प्रश्न सोडवला नाही, तर रस्त्यावरील नमाजाचा प्रश्नही सोडवला आहे. रस्त्यावर नमाज अदा करु नये, अशा सक्त सूचना आम्ही दिल्या होत्या. आता रस्त्यावर कोणीही नमाज अदा करत नसल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले. उत्तर प्रदेशमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या 25 कोटींच्या आसपास आहे. त्यानंतरही ईदसारख्या मुहूर्तावर कुठेही रस्त्यावर नमाज अदा केल्याचे वृत्त नाही. लोक स्वतःही पुढे येऊन रस्त्यांऐवजी घरांमध्ये किंवा मशिदींमध्ये नमाज अदा करून या नव्या आदेशाचे पालन करत असल्याचे ते म्हणाले.
उत्तर प्रदेश सरकारच्या आदेशानंतर गेल्या आठवडय़ापासूनच राज्यातील अनेक प्रार्थनास्थळांवरून लाऊडस्पीकर खाली उतरले जात होते. आता लखनौसह गोमतीनगर, दाळीगंज भागातील अनेक मंदिरे साउंड बॉक्सचा वापर करत आहेत. तसेच लाऊडस्पीकर असलेल्या ठिकाणी आवाजाची पातळी खूपच कमी करण्यात आली आहे. अकाल तख्तने यापूर्वीच गुरुद्वारामध्ये लाऊडस्पीकरवर बंदी घातली आहे. या संदर्भात मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थान संस्थानने भागवत भवनावरील लाऊडस्पीकरही बंद केले. प्रशासनाकडून आपल्याला कोणताही आदेश आलेला नाही, मात्र जातीय सलोखा कायम राहावा यासाठी लाऊडस्पीकर खाली उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे श्रीकृष्ण जन्मस्थान संस्थानचे सचिव कपिल शर्मा यांनी सांगितले. भागवत भवनात 1985 पासून लाऊडस्पीकर लावण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.