ऑनलाईन टीम/तरुण भारत
एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसींनी (Asaduddin owaisi aimim) काल भिवंडीतील सभेत पंतप्रधान मोदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. शरद पवार शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासाठी मोदींना भेटले मग नवाब मलिकांसाठी ही का भेट का घेतली नाही असा थेट सवाल ओवैसींनी उपस्थित केला आहे. मुघलांवरुन मुस्लिमांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोपही ओवैसींनी केला तसंच ज्ञानवापी आणि ताजमहाल या मुद्द्यांवरुनही ओवैसींनी तोफ डागली. मुस्लिमांची ओळख पुसण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय. या सभेत ओवैसींनी महागाईच्या मुद्द्यावरुनही मोदी सरकारला घेरलं.
मलिकांसाठी पवारांनी मोदींची भेट का घेतली नाही?
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करू नका असे पवार म्हणतात. त्यांना तुरुंगात टाकू नका अशी विनंती करतात.परंतु मलिकांना तुरुंगाच्या बाहेर का काढले जात नाही, असा प्रश्नही ओवैसी यांनी उपस्थित केला. संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी नवाब मलिकांपेक्षा जास्त जवळचे झाले आहे. हा यांचा खरा चेहरा आहे. मी सत्य समोर ठेवण्याचे काम करतो
महागाईवरुनही मोदी सरकार हल्लाबोल
ओवैसी म्हणाले, मुस्लीमांना घाबरवले जात आहे. जर हे असेच सुरू राहिले तर लोकशाहीवरील विश्वास उडेल. भारत हा माझा नाही ना मोदींचा आहे. भारत हा द्रविड आदिवासींचा आहे. भाजप दिवस रात्र मुघल-मुघल करत आहेत. सध्या देशात बेरोजगारी मुघलांमुळे आहे का?
आरएसएसवर निशाणा
ओवैसी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देखील निशाणा साधला. आरएसएस हे मुस्लिमांविरोधात आहे. आरएसएस आणि भाजपने जंग-ए-एलान पुकारले आहे. मशिदीवरून होणाऱ्या वादावर ते म्हणाले, बाबरी मशीद आमच्याकडून हिसकावली आहे. आता ज्ञानवापी मशीद देखील हिसकावण्याचा प्रयत्न सुरू आहे.कॉंग्रेसने महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत युती केली आहे.
मुस्लिमांच्या श्रद्धेविरुद्ध बोलले तर कायदेशीर कारवाई का नाही?
ओवैसींनी मुस्लीमविरोधी कारवायांवर भाष्य करत म्हटले की, “त्यांना दाढी, टोपी समस्या, मशिदीची अडचण आहे. अजानचा त्रास होऊ लागला आहे. बाबरी मशिदीचा निर्णय देशात आला तेव्हा मी कुठे होतो, आता यानंतर ज्ञानवापी, मथुरा आणि इतर सर्व ठिकाणांची नावे घेतली गेली आणि आज ते सर्व खरे होत आहे. मोदी, उद्धव ठाकरे, शरद पवार, योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात कोणी काही बोलले तर त्यांच्या घरावर हल्ला होतो. बोलणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाते. मग कोणी आमच्या विरोधात आमच्या श्रद्धेविरुद्ध बोलले तर कायदेशीर कारवाई का होत नाही,” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
खालिद गुड्डूच्या सुटकेची मागणी
2020 मध्ये अनेक गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेला AIMIM भिवंडीचा नेता खालिद गुड्डू याच्या सुटकेची मागणीही ओवैसी यांनी केली. गुड्डूला निरपराध असल्याचे सांगून एआयएमआयएम प्रमुखांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्याची सुटका करण्याची विनंती केली.