सरकार अंतर्गत धुसफूस ?
प्रतिनिधी/ पणजी
विद्यमान सरकारला आता बाहेरील विरोधकांची गरज नाही, या सरकारात अंतर्गत चाललेल्या धुसफुशीतून त्यांचेच लोक विरोधक बनले आहेत, असा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी करून 24 तास उलटले नाहीत, तोच खुद्द दोघा मंत्र्यांनीच सरकारच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केल्यामुळे स्वत: मुख्यमंत्र्यांनाच रस्त्यावर उतरावे लागले की काय अशी चर्चा राजधानीत सुरू झाली आहे.
पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी शुक्रवारी कळंगूट भागात चालणाऱ्या अनेक गैरव्यवहारांचा गौप्यस्फोट करताना त्यासाठी तेथील पोलीस निरीक्षकास जबाबदार धरले होते. मात्र त्यातून त्यांनी अप्रत्यक्षरित्या गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधला होता, असा दावा सरदेसाई यांनी केला होता.
त्याच दिवशी सायंकाळी पणजीचे आमदार तथा मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी राजधानीच्या विविध भागात चाललेल्या स्मार्ट सिटीच्या कामांबद्दल स्वत:ची उद्विग्नता व्यक्त करताना या कामासंबंधी आपण कोणतीही जबाबदारी घेणार नसल्याचे जाहीर केले. ‘आपण कुणी अभियंता नाही आणि रस्ते खोदण्याचे कामही करत नाही. या कामांसाठी तसेच भविष्यात त्यातून काही समस्या उद्भवल्यास त्यासाठी स्मार्ट सिटीच्या अभियंत्यांना जबाबदार धरण्यात येईल’, असेही त्यांनी म्हटले होते. त्याचबरोबर स्मार्ट सिटीच्या कामांचा स्वत: मुख्यमंत्रीच आढावा घेतील व नियोजनानुसार पुढील कामे होतील, असे ते म्हणाले होते.
अशाप्रकारे आधी खंवटे आणि नंतर मोन्सेरात या दोघा मंत्र्यांनी अचानक घेतलेल्या या भूमिकांमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. सरकारात अंतर्गत धुसफूस चालू असल्याचेच हे द्योतक आहे की काय अशी चर्चाही सुरू झाली होती.
त्यातच शनिवारी दिवसभरात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राजधानीच्या विविध भागात चाललेल्या स्मार्ट सिटीच्या कामांची स्वत: पाहणी करून आवश्यक त्या सूचना, मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांच्यासोबत मंत्री मोन्सेरात यांचीही उपस्थिती होतीच, तरीही मुख्यमंत्र्यांच्या या भेटीवरून नगरवासियांमध्ये विविध तर्कवितर्कांना ऊत आला होता.
स्मार्ट सिटीच्या अमर्याद चाललेल्या कामांमुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून पणजीतील नागरिक अक्षरश: मेटाकुटीस आले आहेत. शहर स्मार्ट होईल तेव्हा होईल, सध्या धूळ प्रदूषणाने लोक हैराण झालेले आहेत. सर्व रस्ते खोदून ठेवल्यामुळे पावलोपावली प्रत्येकाची गैरसोयच होत आहे. तरीही कोणताही लोकप्रतिनिधी सदर विषयाकडे गांभीर्याने पाहात नसल्याबद्दल लोक आश्चर्य व्यक्त करत होते. तसेच सरकारवर सतत आरोप-टीका होत होती. या टीकेचे केंद्रबिंदू अर्थातच स्थानिक आमदार या नात्याने मंत्री मोन्सेरात हेच होते. तरीही एवढे दिवस काहीही न बोलणारे मोन्सेरात यांनी शुक्रवारी अचानक केलेल्या वक्तव्यामुळे सरकारबद्दल एक वेगळाच संदेश गेला होता.