तिघा जणांना अटक ः मंत्र्याच्या पुत्रावरही आरोप
वृत्तसंस्था / आगरतळा
त्रिपुराच्या उनाकोटी जिल्हय़ात 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्काराप्रकरणी महिलेसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या गुन्हय़ात राज्याच्या एका मंत्र्याचा पुत्रही सामील असल्याचे बोलले जात आहे. याचमुळे काँग्रेस आणि माकपने मंत्र्याकडून राजीनाम्याची मागणी केली आहे.
19 ऑक्टोबर रोजी कुमारघाटमध्ये एका तीन मजली इमारतीत 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. शेजारी राहणाऱया एका महिलेने या मुलीला संबंधित इमारतीत नेले होते, असा आरोप पीडितेच्या आईने केला आहे. एफआयआरच्या आधारावर एका महिलेसह तीन जणांना अटक करण्यात आली असून अन्य आरोपी सध्या फरार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विप्लव देववर्मा यांनी सांगितले आहे.
सामूहिक बलात्काराच्या गुन्हय़ात सामील सर्व आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. या प्रकरणात त्रिपुराचे कामगारमंत्री आणि भाजप नेते भगवान दास यांच्या पुत्राचे नाव समोर आले आहे. याचमुळे आम्ही या मुद्दय़ावर मुख्यमंत्री माणिक साहा यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करत आहोत, असे काँग्रेसचे माजी आमदार आशिष साहा यांनी म्हटले आहे.
या गुन्हय़ातील मंत्र्याच्या पुत्राच्या भूमिकेचा शोध लावण्यासाठी चौकशीची मागणी आम्ही करत आहोत. मंत्र्याचा पुत्र आरोपी असल्यास त्याला त्वरित अटक करण्यात यावी, असे माकपचे राज्य सचिव जितेंद्र चौधरी यांनी म्हटले आहे. तर भाजपने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
सर्व आरोपींना तुरुंगात पाठविण्याची आमची इच्छा आहे. एफआयआरमध्ये राज्याचे मंत्री दास यांच्या पुत्राचे नाव नाही. तर गुन्हय़ावेळी मंत्र्यांचा पुत्र हा आगरतळा येथे होता. विरोधी पक्षांकडून दास यांची बदनामी करण्याचा कट रचण्यात आल्याचा दावा भाजपने केला आहे. तर मंत्री दास यांनी अद्याप या मुद्दय़ावर कुठलीच टिप्पणी केलेली नाही.