मी लोकांच्या हिताला प्राधान्य देऊन काम करणारा लोकप्रतिनिधी : आमदार अनिलभाऊ बाबर यांची स्पष्टोक्ती
प्रतिनिधी/विटा
मी राजकारणात अनेक वर्ष काम करत आहे. राजकीय परिस्थितीत कुठे जायला मिळाले अगर न मिळाले यापेक्षा समाजकारणाला महत्व देणारा मी माणूस आहे. लोकांच्या हिताला प्राधान्य देऊन काम करणारा हा लोकप्रतिनिधी असतो. नाराजी चा विषय म्हटला तर तो विकास कामासाठी होऊ शकतो सत्तेसाठी मी नाराज होणारा कार्यकर्ता नाही, अशा शब्दात आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
बाळासाहेबांची शिवसेनेचे खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाऊ बाबर हे गुवाहाटीला गेले नसल्याचे स्पष्ट झाले. याबाबत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. आमदार अनिलभाऊ बाबर यांनी आपल्या कौटुंबिक कारणास्तव मी हा दौरा रद्द केल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना आमदार अनिल भाऊ बाबर म्हणाले, सरकार स्थापनेच्या घडामोडी वेळी माझी पत्नी आजारी पडली. त्या आजारपणात त्यांचे निधन झाले. २७ नोव्हेंबर रोजी तिचा जन्मदिवस असल्या कारणाने आमच्या घरी घरगुती कार्यक्रम आहे. अशा परिस्थितीत भावनेचा प्रश्न निर्माण होतो. यामुळेच मी हा दौरा रद्द केला.
या दौऱ्याला मी गेलो नाही याचा अर्थ असा होत नाही की मी नाराज आहे. मी राजकारणात अनेक वर्ष काम करत आहे. राजकीय परिस्थितीत कुठे जायला मिळाले, अगर न मिळाले यापेक्षा समाजकारणाला महत्व देणारा मी माणूस आहे. लोकांच्या हिताला प्राधान्य देऊन काम करणारा लोकप्रतिनिधी असतो, असेही आमदार बाबर म्हणाले.
नाराजीचा विषय म्हटला तर तो विकास कामासाठी होऊ शकतो. सत्तेसाठी मी नाराज होणारा कार्यकर्ता नाही. मी जरी लोकप्रतिनिधी असलो तरी मला सुद्धा भावना आहेत. भावनिक स्तरावर काम करत असताना मलाही कौटुंबिक कार्यक्रमात हजेरी लावणे महत्त्वाचे ठरते. माझा स्वभाव हा कुटुंबवत्सल आहे. त्यामुळे कुटुंबाच्या भावना सोडून मी त्यांच्यापासून लांब जाऊ शकत नाही. त्यामुळेच मी या दौऱ्यावर गेलो नाही. कृपया याचा अर्थ मी नाराज आहे असा कोणी काढू नये, असे आमदार बाबर यांनी म्हंटले आहे.