आमदार जयकुमार गोरेंनी साधला रामराजेंचे नाव न घेता निशाणा : हर घर झेंडा या बैठकीनंतर पत्रकारांशी साधला संवाद
प्रतिनिधी/सातारा
माशाला पाण्याशिवाय रहाता येत नाही. तसेच काही लोकांना सत्तेशिवाय रहाता येत नाही. सत्ता नसली की तडफड होते. सत्तेशिवाय आमदारकी निवडून येवून दाखवावी, मग कोणत्याही पक्षात त्यांनी खुशाल पक्ष प्रवेश करावा, अशा शब्दात रामराजेंचे नाव न घेता आमदार जयकुमार गोरे यांनी निशाणा साधला. ते पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देत होते. दरम्यान, त्यांनी जिह्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांना हर घर झेंडा हे अभियान यशस्वी करण्याच्या सुचना दिल्या.
शासकीय विश्रामगृहात हर घर झेंडा हे अभियान यशस्वी करण्याच्या अनुषंगाने भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी भाजपाचे जिह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. प्रत्येक पदाधिकाऱयांनी हर घर झेंडा हे अभियान यशस्वी करायचे आहे, अशा सुचना त्यांनी दिल्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार जयकुमार गोरे म्हणाले, शिवसेना आणि भाजपाचेच सरकार असून शिवसेना ही आमचीच आहे. दोन्ही पक्ष एकच आहेत. महायुतीचे सरकार आहे. सर्वसामान्यांचे सरकार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगले निर्णय घेत आहेत, असे त्यांनी सांगितले. पुढे रामराजे भाजपामध्ये येणार आहेत अशी चर्चा आहे त्यावर तुमचे काय मत अशी पत्रकारांनी विचारणा केली असता ते म्हणाले, मासा पाण्याविना राहू शकत नाही तसेच काही लोक सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. राहुल नार्वेकर हे माझे मित्र आहेत. ते कोणाचे जावई आहेत कोण त्यांचे सासरे आहेत हे मला माहिती नाही. परंतु ते माझे चांगले मित्र आहेत. ज्यांना सत्तेशिवाय जमत नाही अशा मंडळींनी सत्ता नसताना निवडून यावे मग पक्ष प्रवेश करावा, ते आता सभापती आहेत का?, अशा शब्दात त्यांनी रामराजेंच्यावर नाव न घेता निशाणा साधला.