आमदार प्रकाश आबिटकर यांची मागणी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन
प्रतिनिधी/कोल्हापूर
राज्यात झालेल्या सत्तांतरामुळे भूविकास बँकेच्या हजारो कर्जदार शेतकऱयांना व शेकडो कर्मचाऱयांना अनेक वर्षाच्या संघर्षानंतर मागणी पुर्ण होते की नाही अशी भिती वाटत आहे. यामुळे भूविकास बँकेच्या हजारो कर्जदार शेतकऱ्यांना व कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय तात्काळ घ्या अशी मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, महाराष्ट्र राज्य कृषि व ग्रामीण बँक (भूविकास बँक) या बँकेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे राज्यातील शेतकऱ्यांना मध्यम आणि दिर्घ मुदतीची कर्जे देण्यात येत होती. महाराष्ट्र शासनाने भूविकास बँकेला दिलेली शासन हमी नाकारल्या नंतर राज्यातील भूविकास बँकेचे कामकाज गेली 20 वर्षे ठप्प आहे. यामुळे भू-विकास बँकेतील थकबाकीदार कर्जदार गेली 20 वर्षे बँकेच्या कर्जाच्या बोजामुळे हालाखीचे जिवन जगत आहेत. सन 2022 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या शेतकऱयांचे कर्जमाफ करण्याची घोषणा केली होती. यामुळे हजारो शेतकऱयांना याचा लाभ होणार आहे. तसेच अनेक वर्षे काम करणाऱया कर्मचाऱ्यांना त्यांची थकीत देणी मिळाल्यामुळे त्यांना उर्वरीत आयुष्यामध्ये या निर्णयाने मिळणाऱया अर्थसहाय्याने फायदा होणार आहे.
हे ही वाचा : नवीन सरकार गोंधळलेलेचं, मला मुख्यमंत्र्यांची काळजी वाटतेयं-सुप्रिया सुळे
भू-विकास बँकेतील थकबाकीदार कर्जदार गेली 20 ते 25 वर्षे बँकेच्या कर्जाच्या बोजामुळे हालाखीचे जिवन जगत आहेत. त्यांच्या 7/12 उताऱ्यावर कर्जाचा बोजा असल्यामुळे कोणतेही नवीन कर्ज उपलब्ध होत नाही. तसेच बँकेकडूनही वेळोवेळी वसुलीच्या नोटीसांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या शेतकऱयांचे कर्ज माफ करण्याकरीता शासनाकडे वेळोवेळी मागणीही केली होती. ज्या पध्दतीने राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारने ज्या प्रमाणे प्रामाणिक कर्ज भरणाऱ्या लाखो शेतकऱयांना प्रोत्साहानापर अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला त्याचप्रमाणे भूविकास बँकेचे हजारो कर्जदार शेतकरी व कर्मचारी यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केलेली आहे.