जबाबदार व्यक्तींना अटक करण्याची व कंपनीकडून नुकसानी वसुल करण्याची मागणी
प्रतिनिधी /वास्को
मुरगाव व वास्कोतील नागरिकांना 22 तास अंधारात काढावे लागल्याने मुरगांवचे आमदार संकल्प आमोणकर यांनी इंडियन ऑईल अदानी गॅस कंपनीविरूध्द तीव्र संताप व्यक्त केला आहे. गॅस वाहिनीच्या कामाच्या सुरक्षेवरही त्यांनी संशय व्यक्त केला आहे. वीज वाहिन्या तोडल्याप्रकरणी पोलिसांनी कुणालाही अटक केलेली नसल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या घटनेमुळे झालेले संपूर्ण नुकसान संबंधीत कंपनीकडूनच वसुल करण्यात यावे तसेच या नुकसानाली जबाबदार असलेल्या लोकांविरूध्द कारवाई न झाल्यास गॅस वाहिनीचे पुढील काम रोखण्यात येईल असाही ईशारा त्यांनी दिला आहे.
इंडियन ऑईल अदानी गॅस कंपनीने वीज खात्याच्या भुमीगत वाहिनी तोडल्याने संपूर्ण मुरगांव मतदारसंघ 22 तास अंधारात राहिला ही दुदैवी घटना आहे. आपण स्वतः घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीचा आढावा घेतला. रहिवासी किंवा वीज खात्याचा कोणताही दोष नसताना लोकांना मोठय़ा प्रमाणात नुकसान सोसावे लागले आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेक व्यवसायीकांचे नुकसान झाले आहे. अनेकांची गैरसोयही झाली असे आमदार आमोणकर यांनी म्हटले आहे. सामान्य नागरिकांना वीज व पाण्याच्या जोडणीसाठी अनेक परवाने घ्यावे लागतात. मोठय़ा कंपन्यांना मात्र कोणत्याही परवान्यांची गरज पडत नाही. ते हवे तेव्हा रस्ते खोदायला मोकळे असतात. सदर कंपनी व कंत्राटदाराने रस्त्यावर खड्डे खोदण्यापूर्वी कोणतीही खबरदारी घेतलेली नाही. हा प्रकार पूर्णपणे बेजबाबदारपणाचा आहे. मोठय़ा उद्योग समुहाचे हे काम असल्याने त्यांना कुणाचीही भिती वाटत नाही. यापूर्वीही सदर कंपनीच्या कामात असेच प्रकार वास्कोत व इतर ठिकाणी घडलेले आहेत. हे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी सरकारने हस्तक्षेप करून जबाबदार लोकांवर कारवाई करावी, त्यांना अटक करावी तसेच कंपनीकडून दंडही वसुल करावा अशी मागणी आमदार संकल्प आमोणकर यांनी केली आहे. गॅस वाहिनी घालणाऱया कंपनीच्या क्षमतेचा, त्यांच्या विश्वासार्हतेचा, सुरक्षीततेचा विचार करण्यात यावा असे स्पष्ट करून आमदार आमोणकर यांनी गॅस वाहिनीच्या कामाच्या सुरक्षतेबाबत संशय व्यक्त केला आहे.
भुमीगत वीज वाहिन्या तोडल्याने वीज खात्याला लाखोंचे नुकसान
दरम्यान, वास्को शहरात ज्या ठिकाणी वीज खात्याच्या भुमीगत वाहिन्या तोडण्यात आलेल्या आहेत. त्या ठिकाणी त्या वाहिन्या पुन्हा सुरक्षीत करण्याचे काम काल दिवसभर सुरूच होते. वास्को व परीसरातील वीज पुरवठा गुरूवारी रात्री साडे दहाच्या सुमारास सुरळीत झाला तरी शुक्रवारी दिवसा आणि रात्रीसुध्दा वीजेचा लपंडाव सुरूच होता. भुमीगत वीज वाहिन्या तोडण्यात आल्याने घटनास्थळी वीज खात्याचे जवळपास सात लाखांचे प्रत्यक्ष नुकसान झालेले आहे. शिवाय 22 तास खंडीत झालेल्या वीज पुरवठय़ामुळे वीज खात्याला लाखोंच्या महसुलाला मुकावे लागलेले आहे. वास्को परीसर व मुरगाव मतदारसंघातील लोकांचे 22 तास वीज पुरवठा खंडीत झालेले नुकसानही मोठे आहे.