प्रतिनिधी/मिरज
मिरज विधानसभा मतदार संघातील भाजपा आमदार सुरेश खाडे मंगळवारी राज्याचेट कॅबिनेट मंत्री म्हणून शपथबध्द झाले. यानिमित्ताने मंत्री मंडळात त्यांची दुसऱ्यांदा वर्णी लागली. भाजपा निष्ठा आणि जिल्ह्यात पक्षवाढीसाठी खाडेंकडून झालेले प्रयत्न त्यांच्या पथ्यावर पडल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या मुशीत तयार झालेला कार्यकर्ता आज उपमुख्यमंत्री आणि भाजपानेते देवेंद्र फडणवीस यांचाही विश्वास संपादन करण्यात यशस्वी ठरला. हेच आजच्या शपथ विधीवरुन स्पष्ट झाले.
काँग्रेस बालेकिल्ल्याला सुरुंग
सांगली जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून राज्यात ओळखला जायचा. या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा अनेक दिग्गज नेत्यांनी प्रयत्न केला. पण, अपवाद वगळता त्यांना यश आले नाही. ही किमया आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी मात्र काही वर्षातच भाजपाला यशस्वी करुन दाखविली. रिपाइंतून राजकारणात प्रारंभ केलेल्या खाडेंना प्रारंभी अपयशालाच सामोरे जावे लागले. पण, जिद्दी असलेल्या खाडेंनी मतदारांशी आपली नाळ कधीही तोडू दिली नाही. याचे फलित म्हणून 2004 साली काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात जत विधानसभा मतदार संघातून खाडे यांनी भाजपाचे कमळ फुलविले. हा विजय भाजपाच्या दृष्टीने अतिशय मोलाचा होता. तेव्हापासून सुरू झालेली भाजपाची घोडदौड आज अनेक स्थानिक स्वराज्य संस्था हस्तगत करण्यापर्यंत पोहचली. यात आमदार खाडेंचा सिंहाचा वाटा आहे.
पक्षवाढीसाठी जिल्ह्यात लक्ष
मिरज विधानसभा मतदार संघावर 2009 ला आरक्षण पडल्याने आमदार खाडेंचा मिरजेत प्रवेश झाला. त्यावेळीही मिरज मतदार संघ स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेसच्या अधिपत्त्याखाली आणि माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्यामागे होता. आमदार खाडेंनी आपल्या यशाची परंपरा मिरजेतही सुरुच ठेवली. 2009 साली ते मोठय़ा मताधिक्याने विजयी झाले. तर 2014 आणि 2019 लाही भाजपाचे कमळ फुलविण्यात ते मागे राहिले नाहीत. या कालावधीत मिरज मतदार संघाबरोबर जिह्यातील अन्य मतदार संघात भाजपाला यश मिळावे, म्हणून आमदार खाडेंचे प्रयत्न मोलाचे ठरले.
जि.प.वर भाजपाचा झेंडा
विधान सभेपाठोपाठ सांगली लोकसभाही दोनवेळा भाजपाने जिंकली. तरीही अनेक स्थानिक स्वराज्य संस्था काँगेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात होत्या. त्या भाजपाच्या ताब्यात याव्यात म्हणून भाजपा पक्षश्रेष्ठींनी आमदार खाडेंवर मोठी जबाबदारी सोपविली होती. आणि ती खाडेंनी यशस्वी करुन दाखविली. भाजपाचे नगण्य अस्तित्व असलेल्या जिल्हा परिषदेवर कमळ फुलविण्यात भाजपाला यश आले. मिरज तालुक्यातून 11 पैकी सात जिल्हा परिषद गटात भाजपाला यश मिळवून खाडेंनी बाजी मारली. मिरज पंचायत समिती अस्तित्वापासून काँग्रेसच्या ताब्यात होती. राष्ट्रवादीला ९मले नाही ते खाडेंनी केले. 22 गणातून दहा गणावर भाजपाचे कमळ फुलविण्याबरोबर दोन अपक्ष सदस्यांना सोबत घेऊन पाच वर्षे पंचायत समितीवर भाजपाचा झेंडा फडकविला. काँग्रेस-राष्ट्रवादीने एकसंघ प्रयत्न करुनही अपवाद वगळता त्यांना शेवटपर्यंत शक्य झाले नाही.
आव्हान स्विकारुन मनपा जिंकली
जिह्यातील सर्वात मोठी महापालिका काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अधिपत्त्याखाली होती. ती भाजपाच्या ताब्यात यावी, अशी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मनस्वी इच्छा होता. त्यासाठी त्यांनी 100 कोटींचे बक्षिसही जाहीर केले होते. आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी मनपा हस्तगत करण्यात सिंहाचा वाटा उचलला. आणि फडणवीसांकडून शंभर कोटींचे बक्षिस पटकावले. याच शंभर कोटीतून मनपा क्षेत्रातील अनेक प्रलंबित कामे मार्गी लागली आहेत.
पक्षनिष्ठेचेच फळ…
भाजपा निष्ठा आणि जिल्ह्यात पक्षवाढीसाठी आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्याकडून वेळोवेळी झालेले प्रयत्न, भाजपामधील प्रदिर्घ काळाचा अनुभव आणि एक ज्येष्ठ नेते याची दखल घेऊन भाजपा पक्षश्रेष्ठींनी आमदार खाडेंना कॅबिनेट मंत्री म्हणून बढती दिली. यापूर्वीही त्यांचा सामाजिक न्यायमंत्री पद देऊन पक्षाने सन्मान केला होता. पण, तो फार काळाचा नव्हता, याची सल पक्षनेतृत्वाला होती. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्ताराच्या पहिल्याच टप्प्यात आमदार सुरेशभाऊ खाडेंना कॅबिनेट मंत्रीपद देऊन भाजपाने त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या कार्याला न्याय दिला आहे, असेच म्हणावे लागले.