पुणे / प्रतिनिधी :
पुण्यातील कसबा पेठ भागातील पुण्येश्वर मंदिर आणि शनिवार पेठ भागातील नारायणेश्वर मंदिर या दोन स्मारकांच्या परिसरात पुरातत्व विभागाकडून उत्खनन करणे आवश्यक आहे. सहस्त्र वर्षांचा वारसा असणाऱ्या प्राचीन वास्तूचे जतन आणि संरक्षण करण्यासाठी तातडीने पावले उचलण्यासंबंधी पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाला याआधीच पत्र दिले असून, याबाबत महिनाभरात कार्यवाही न झाल्यास मनसेकडून आक्रमक भूमिका घेण्यात येईल, असा इशारा मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी दिला.
याबाबत बोलताना शिंदे म्हणाले, पुणे शहराचे नाव पुण्येश्वर मंदिरावरून पडले. चौदाव्या शतकात परकीय आक्रमकांनी हे मंदिर नष्ट केले. मात्र, पुणेकरांच्या स्मृतीत हे मंदिर कायम राहिले. बॉम्बे गॅझेटीर 1885 तसेच पुणे महापालिकेचे दिनांक 15/8/1951 चे गॅझेट यांच्यासह कित्येक ऐतिहासिक आणि अधिकृत दस्तावेजांमध्ये पुण्येश्वर मंदिरांचे उल्लेख आढळतात. परकीय आक्रमकांच्या हल्ल्यात जे पुण्येश्वर मंदिर उद्ध्वस्त झाले, त्याच भूमीवर धाकटा शेख सल्ला दर्गा किंवा छोटा शेख सल्ला दर्गा या नावाने ओळखला जाणारा दर्गा उभारला आहे आणि त्याच्या बांधकामात उद्ध्वस्त मंदिरांच्या अवशेषांचा वापर करण्यात आला आहे. जुलै 2010 मध्ये या दर्गा व्यवस्थापनाने कोणतीही पूर्व अनुमती महापालिकेकडून न घेता दर्ग्याची इमारत वाढविण्यासाठी बांधकामास प्रारंभ केला. शिवाय नदीपात्रात मनपाकडून पुनर्निर्माणकार्य सुरू असताना खोदकामात दर्ग्याजवळील परिसरात प्राचीन मंदिरांचे अवशेष नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर जनक्षोभ ध्यानी घेऊन महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व खात्याच्या पुणे कार्यालयाने या दर्ग्याचे पुढील (वाढीव) बांधकाम तातडीने रोखण्याची विनंती केली. अलीकडे महापालिकेची अनुमती मिळवून बांधकाम पुन्हा सुरू करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न उत्खनन अशक्य व्हावे, यासाठीच होत आहे. दर्ग्याचे बांधकाम एकूण जमिनीच्या छोटय़ा भागावर आहे आणि उर्वरित मोकळय़ा जागेत उत्खनन करण्यास काही प्रत्यवाय असण्याचे कारण नाही. उलट ऐतिहासिक वारशाचे संशोधन करण्यासाठी असे उत्खनन अत्यावश्यक आहे.
नारायणेश्वर मंदिराचा (थोरला शेख सल्ला दर्गा) विषय असाच आहे. 2006 साली दर्ग्याच्या नदीकाठच्या संरक्षक भिंतीचा काही भाग ढासळल्याने तिचे पुनर्बांधकाम चालू असताना मंदिराचे अवशेष सापडले. विधान परिषदेत यावर चर्चा झाली आणि 2007 मध्ये उत्खनन न करता मातीच्या खाली काय आहे हे तपासण्यासाठी शासनाने समिती गठीत केली. त्या समितीकडून पुढे काही झाले नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
…मनसेचा एक महिन्याचा अल्टिमेटम
शासनाने विनंती केल्यामुळे गठीत करण्यात आलेल्या डेक्कन कॉलेजच्या समितीने 2013 मध्ये शोधन अहवाल देऊन दर्ग्याच्या जमिनीमध्ये पुरातन मंदिरांचे अवशेष असल्याचे स्पष्ट केले आहे. उत्खननाचे अधिकार केवळ केंद्र शासनाला असल्याने केंद्र शासनाच्या पुरातत्व खात्याने यावर कारवाई करावी, असे सांगत पुरातत्व विभागाने कसबा पेठ भागात उत्खनन करण्याच्या कामास त्वरित प्रारंभ करावा, या जागी कोणतेही नवे बांधकाम न करण्याचे प्रतिबंधात्मक आदेश देण्यात यावेत, अशी मागणी आम्ही केली आहे. तथापि, काहीच होणार नसेल, तर मनसेला आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा देत एक महिन्याचा अल्टिमेटम त्यांनी दिला.
फडणविसांनी छेडलेला मुद्दा मनसेने घेतला हाती
नुकत्याच झालेल्या कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी पुण्येश्वर मंदिरासंदर्भात आपली भूमिका मांडत हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. आता मनसेने हा मुद्दा हाती घेत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे सरकार आता या विषयातही तातडीने लक्ष घालणार का, याकडे लक्ष लागले आहे.