राज्यात एकीकडे राज्यपाल, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरुन आरोप-प्रत्यारोप होत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी गटाध्यक्षांच्या मेळाव्यात सावध भूमिका घेताना मनसेने राष्ट्रपुरूषांच्या बदनामीवरुन जे राजकारण सुरू आहे ते थांबवा तसेच आपण आगामी काळात तरूणांपुढे काय आदर्श निर्माण करणार इथपासून ते मनसेने गेल्या 16 वर्षात केलेल्या आंदोलनाचा पाढाच वाचला आणि आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मनसेच्या राज ठाकरे यांचा गटाध्यक्षांना मार्गदर्शक करणारा पहिलाच मोठा मेळावा रविवारी गोरेगाव येथील नेस्को संकुलात पार पडला जिथे काही दिवसापूर्वी उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा झाला होता. त्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटाचा दसरा मेळावा झाला, काँग्रेसची भारत जोडो यात्रा राज्यात येऊन गेली तर राष्ट्रवादीचेही मार्गदर्शन शिबीर साईबाबांच्या शिर्डीत संपन्न झाले. राज्यातील गेल्या महिन्याभरातील राजकारण बघता राष्ट्रपुरूषांची बदनामी, राज्यातील प्रकल्प स्थलांतराचा विषय या विषयावरुन महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यात भरीस भर म्हणून कालपर्यंत खोक्यापर्यंत असणारा विषय आता कंटेनरवर येऊन ठेपला आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाख्या देवीच्या दर्शनानंतर गुवाहाटी येथे बोलताना मोठे मोठे खोके घेण्याची ऐपत आमदारांची आहे का? फ्रीज एवढय़ा कंटेनरमधले खोके कोणाकडे गेले आणि कोणी पचवले हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे. फ्रीजमध्ये भरून कुठे खोके गेले? शोध घेऊन सांगतो. आम्ही जे करतो ते खुलेआम करतो
लपूनछपून करत नाही, त्यामुळे खोके, कंटेनर, रेडा पुन्हा एकदा गुवाहाटी सहलीच्या निमित्ताने चर्चेला आला आहे.
मुंबई महापालिका निवडणुकांसाठी आता सर्वच राजकीय पक्षानी चांगलीच कंबर कसली असून रविवारी राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा मराठी भूमिपुत्रांच्या अन्यायावर केलेल्या आंदोलनाच्या आठवणी ताज्या केल्या. सध्या शिवसेनेची झालेली शकले, भाजपवर सातत्याने महाराष्ट्रातून गुजरातला गेलेले प्रकल्प आणि त्याला भाजपची मराठी विरोधी भूमिका जबाबदार असल्याचे जनतेच्या मनावर ठसवण्यात यशस्वी झालेले विरोधक बघता, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठी स्पेस असल्याचे दिसत आहे. मात्र त्यासाठी त्यांनी निवडणूकपूर्व सावध भूमिका घेत लोकांमध्ये जावे लागणार आहे. त्या दिशेने राज यांनी रविवारी गटाध्यक्षांना मार्गदर्शन करताना कोणावरही थेट आरोप न करता गेल्या 16 वर्षात महाराष्ट्रात सर्वाधिक आंदोलने केली. मात्र काही लोकांनी मनसेने केलेले आंदोलन लोकांच्या विस्मरणात कसे जाईल याची पूरेपूर काळजी घेतल्याचे सांगितले. गेल्या 16 वर्षातील मनसेचा स्ट्राईक रेट काढला तर त्यात मनसे हा सर्वाधिक यशस्वी पक्ष असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. कालच्या राज यांच्या बोलण्यावरुन राज हे सध्या तरी कोणाबरोबर निवडणूक पूर्व युती न करता आपल्या पक्षाची रेषा वाढवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आणि मराठी मतांना चुचकारण्याचा आगामी काळात राज यांचा प्रयत्न असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज यांनी मधल्या काळात मराठीचा मुद्दा सोडून पक्षाचा हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर भर असल्याची भूमिका घेतली होती, मात्र कालच्या सभेत त्यांनी मराठी माणूस आणि भूमिपुत्रांच्या हक्कासाठी मनसेने केलेली आंदोलने तसेच मशिदीवरील भोंगे उतरवण्याची मनसेची भूमिका ही बाळासाहेबांची भूमिका होती आणि बाळासाहेबांची इच्छा आपण पूर्ण केल्याचे सांगितले. तर रझा अकादमीने केलेल्या हल्ल्याच्या वेळी केवळ मनसेने त्याविरोधात आंदोलन केले होते मग आत्ता हिंदुत्व, हिंदुत्व करणारे तेव्हा कुठे गेले होते असा सवालही राज यांनी शिवसेना आणि भाजपला केला. म्हणजेच आगामी काळात राज ठाकरे यांचा मनसे पक्ष हा कोणाशीही युती न करता आपली स्वतंत्र भूमिका घेऊन निवडणूक लढविणार असल्याचे दिसत आहे. 2017 च्या महापालिका निवडणुकीत मनसे पक्षाच्यावतीने आमच्या राजाला साथ द्या हे निवडणूक प्रचारगीत पक्षाने बनवले होते आणि त्या निवडणुकीत राजाला केवळ सात जागांवर समाधान मानावे लागले होते. आता मनसेच्या कालच्या मेळाव्यानंतर मनसेची पुढील भूमिका कोणाला साथ देणारी असणार की कोणाला मात देणारी असणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कॅगकडून महापलिका घोटाळ्याच्या चौकशीला सुरूवात
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दुष्टीने भाजपने एकीकडे मुंबईतील सर्व विधानसभांमध्ये जागर यात्रा सुरू केली आहे तर उध्दव ठाकरे यांच्या शिवसेना गटाकडून मुंबईत आदित्य ठाकरे यांनी सभांचा तसेच विविध कार्यक्रमांचा सपाटा लावत भाजप आणि शिंदे गटावर हल्ला सुरूच ठेवला आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार मुंबई महापालिकेतील बारा हजार कोटीच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी पॅगकडून (कंट्रोल ऑफ ऑडिटर जनरल ऑफ इंडिया) सुरू झाली आहे. गेल्याच आठवडय़ात पॅगचे सुमारे दहा ते बारा अधिकारी महापालिका मुख्यालयात विविध खात्यामध्ये दाखल झाले. येत्या 16 डिसेंबरपूर्वी सर्व कामांचे ऑडिट केले जाणार असल्याची माहिती असून महापालिका निवडणुकीपूर्वी भाजप व शिंदे गटाकडून शिवसेनेच्या अडचणी वाढविण्याचे काम सुरू असून यात अधिकाऱयांची मात्र चांगलीच झोपच उडाली आहे. 12 हजार 23 कोटी 88 लाख रुपये खर्चाच्या कामांचे विशेष लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. त्यात प्रामुख्याने करोनाकाळात विविध बाबींवर खर्च झालेले 3538.73 कोटी, दहिसर येथे अजमेरा यांच्या भूखंडाची 339.14 कोटींना पालिकेने केलेली खरेदी, चार पुलांच्या बांधकामावर झालेला 1496 कोटींचा खर्च, करोनाकाळात तीन रुग्णालयात करण्यात आलेली 904.84 कोटींची खरेदी, शहरातील 56 रस्त्यांच्या दुरुस्तीवरील 2286.24 कोटींचा खर्च, सहा सांडपाणी प्रकल्पावरील 1084.61 कोटींचा खर्च, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पावरील 1020.48 कोटींचा खर्च आदींचे लेखापरीक्षण करण्याची विनंती
केली पॅगला करण्यात आली असल्याची माहिती आहे. हा लेखापरीक्षण अहवाल हा निवडणुकीच्या पूर्वी आल्यास आणि या अहवालात काही लोकांवर ठपला ठेवल्यास निवडणुकीच्या पूर्वी मोठय़ा प्रमाणात पक्षांतर होऊ शकते.
प्रवीण काळे