ऑनलाईन टीम / तरुण भारत :
एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यात पक्षबांधणीचा कार्यक्रम हाती घेतला असतानाच पुण्यात मनसेला मोठं खिंडार पडलं आहे. मनसेचे पुणे माथाडी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे (Nilesh mazire) यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आल्यानंतर तब्बल 400 पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचे राजीनामे दिले. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला हा मोठा धक्का मानला जात आहे.
काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी निलेश माझिरे यांची माथाडी कामगार आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदावरुन हकालपट्टी केली. त्यामुळे मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही नाराज होते. पुण्यातील मनसेचा चेहरा असलेले वसंत मोरेही या कारवाईवर नाराज होते. त्यांनी ही नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. माझिरे यांची पदावरुन हकालपट्टी झाल्यामुळे पुणे मनसेत काहीच अलबेल नसल्याचं स्पष्ट होत होतं. अखेर नाराज असलेल्या माझिरे यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. त्यांच्यासोबत पक्षातील 400 पदाधिकाऱ्यांनीही मनसेला अखेरचा रामराम ठोकला.
अधिक वाचा : वसंत मोरे राष्ट्रवादीत जाणार?
माझिरे हे वसंत मोरे यांचे खंदे शिलेदार आहेत. पक्षातील अंतर्गत गटबाजीचा माझिरे यांना फटका बसल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, वसंत मोरेही पक्षातील अंतर्गत गटबाजीवर नाराज आहेत. कालच त्यांना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मोरे मनसेची साथ सोडणार का? असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे.