ऑनलाईन टीम/भारत
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. शिराळा न्यायालयाने बजावलेले अजामीनपात्र वॉरंट रद्द झाले आहे. इस्लामपूर सत्र न्यायालयाने याबाबत आदेश दिलेत. अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यासाठी मनसेकडून शिराळा न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आला होता, मात्र तो नामंजूर झाला. त्यानंतर मनसेने इस्लामपूर न्यायालयामध्ये (islampur session court) धाव घेतली होती. या अर्जावर सुनावणी पार पडली, ज्यामध्ये राज ठाकरे यांना बजावण्यात आलेला अजामीनपात्र वॉरंट इस्लामपूर न्यायालयाकडून रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे राज ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे.
२००८मध्ये रेल्वे भरती प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आंदोलन करण्यात आलं होतं. यामधून कल्याण पोलिसांनी राज ठाकरे यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर मनसेकडून राज्यभर आंदोलन करण्यात आले होते. याप्रकरणी रेल्वेच्या कल्याण न्यायालयात राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना रत्नागिरी येथे अटक करून कल्याण न्यायालयात नेण्यात आले होते. त्यामुळे मनसेने आंदोलन करून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बंद पुकारला होता. यावेळी सांगलीच्या शिराळा मध्ये मनसेकडून तानाजी सावंत यांनी शेडगेवाडी येथे बंद पुकारून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले म्हणून राज ठाकरे, तानाजी सावंत आणि काही जाणांवर हे गुन्हे दाखल झाले होते.