एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे, की युरोपमध्ये 11 वर्षेपर्यंतच्या 91 टक्के मुलांकडे स्मार्टफोन आहे. यातील अनेक मुले स्मार्टफोनची गुलाम बनली आहेत. वयाच्या 11 व्या वर्षापर्यंत स्मार्टफोन असणारी 65 टक्के मुले वयाच्या 19 व्या वर्षापर्यंत डिप्रेशन किंवा नैराश्य विकाराची शिकार बनतात, असे या सर्वेक्षणात दिसून आले आहे. स्मार्टफोन जणू बालकांसाठी धोक्याची घंटीच ठरत आहे.
भारतातही आता स्मार्टफोनचे वेड वाढत आहे. आर्थिकदृष्टय़ा सुस्थितीत असणाऱया कुटुंबांमध्ये लहान मुलांनाही स्मार्टफोन घेऊन देण्याची पद्धत रुढ झाली आहे. तथापि, युरोपपेक्षा भारतात हे प्रमाण कमी असून मध्यम आणि उच्च आर्थिक श्रेणीतील सुमारे 40 टक्के मुलांकडे वयाच्या 12 व्या वर्षापर्यंत स्मार्टफोन आलेला असतो, असे दिसून आले आहे. मात्र, युरोप आणि अमेरिकेत हे प्रमाण 90 टक्क्मयांपेक्षाही अधिक झालेले आहे.
मोबाईलचा उपयोग मुले कशासाठी आणि किती करतात? यावर कोणाचेही नियंत्रण राहात नाही. पालक सातत्याने मुलांवर लक्ष ठेवू शकत नाहीत. मोबाईल उपयोगाचा कालावधी मर्यादित करणारे सॉफ्टवेअरही फारसे उपयोगाचे ठरत नाही. स्मार्टफोन किती वेळ वापरावा, याचे भान लहान मुलांना नसते. स्मार्टफोनवर पोर्नोग्राफी किंवा अश्लील चित्रण पाहण्याचे व्यसन कित्येक लहान मुलांनाही जडलेले असते, असे सर्वेक्षणात दिसून आले आहे. नको त्या वयात अनेक घातक बाबी स्मार्टफोनमुळे मुलांना समजतात आणि त्यांची मनःस्थिती पूर्णतः बिघडून जाते. वरकरणी सुरुवातीला याचे कुठलेही लक्षण दिसत नाही.
तथापि, मोबाईलचे व्यसन लागल्यानंतर एक-दोन वर्षातच मुले एकलकोंडी बनतात. माणसांमध्ये मिसळण्याऐवजी मोबाईलशी तासन्तास चाळे करणे त्यांना आवडू लागते. त्यामुळे लोकांना सामोरे जाण्याची त्यांची क्षमता नाहीशी होऊ लागते. वाद-विवाद करणे, आपले म्हणणे पटवून देण्याचा जोरदार प्रयत्न करणे इत्यादी कौशल्ये मुले विसरू लागतात. ती भेदरट आणि लाजाळू बनण्याची शक्मयता मोठय़ा प्रमाणावर निर्माण होते. काही मुलांमध्ये याच्या उलट प्रतिक्रिया होते. ती अधिक प्रमाणात आक्रमक, हट्टी, दुराग्रही आणि हेकट बनतात. दोन्ही बाजूंनी त्यांचे नुकसानच होते, असे दिसून आले आहे. त्यांची खेळण्याची सवय मोडल्याने शारीरिक हालचाल कमी होते आणि टाईप-2 मधुमेह, रक्तदाब आदी प्रौढ वयात होणाऱया विकारांची शिकारही ही मुले मोबाईलच्या अतिवापरामुळे बनतात, असे सर्वेक्षणात दिसून आले आहे. युरोपमध्ये सध्या यावर जोरदार विचारमंथन सुरू असून वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत मोबाईल किंवा स्मार्टफोनचा उपयोग प्रतिबंधित करावा, असे कायदे करण्याचा विचार सुरू आहे. अशा कायद्यांना मोबाईल कंपन्यांची लॉबी विरोध करू शकते. तरीही नव्या पिढीचे भवितव्य लक्षात घेऊन असे कायदे करण्याची आवश्यकता बालमानस तज्ञांनी व्यक्त केली आहे.
भारतात आज ही समस्या प्रकर्षाने जाणवत नसली तरी येत्या दहा वर्षात या समस्येशी दोन हात करावे लागणार, एवढे निश्चित आहे. इ. स. 2000 मध्ये अवघ्या 5 टक्के मुलांकडे असणारा मोबाईल आता 30 ते 35 टक्के अल्पवयीन मुलांच्या हातात स्मार्टफोन बनून आला आहे. त्यामुळे भारताने आतापासूनच या समस्येवर तोडगा काढण्याच्या दिशेने वेगाने पावले उचलण्याची आवश्यकता आहे.