डोंगर पोखरुन झऱ्यांद्वारे मिळविले पाणी : तीन डोंगरांच्या दरीमध्ये बनविले ‘नंदनवन’,बहुगुणी गोमूत्र व शेणाद्वारे बनविले ‘जीवामृत’
सागर जावडेकर /पणजी
सावईवेरेच्या बोणये शिलवाडा येथील कष्टकरी शेतकरी – बागायतदार संजय पाटील हे आधुनिक युगातील ‘भगिरथ’च म्हणावे लागेल. एका गाईच्या आधारे महिन्याकाठी 5 हजार लिटर ‘जीवामृत’ तयार करुन ते थेट झाडांना पोहोचविण्यासाठी ठिबक सिंचन योजनेचा वापर करणारे पाटील आपल्या पोफळी बागायतीतून 500 किलो नव्हे, तब्बल दीड ते दोन हजार किलो सुपारी उत्पादन तेही दर्जेदार उत्पादन मिळवित आहेत. 300 किलो मिरीचे उत्पादन घेतात व यासाठी लागणारे पाणी मिळविण्यासाठी स्वत: भगिरथ बनले!
संजय पाटील! गोव्याच्या कृषी क्षेत्रात एक दमदार पाऊल टाकणारा हा बागायतदार. त्याच्या संपूर्ण यशोगाथेचे सार त्यांच्या कष्टातून प्रकट होते. सावईवेरेच्या अत्यंत दुर्गम अशा भागात तीन डोंगरांच्या दरीमधील जागेत त्यांची बागायत. पोफळी बरोबरच माड, मिरी, केळी, अननस इत्यादींची लागवड ते करतात. फेब्रुवारी अखेरीस पाण्यासाठी दाही दिशा वणवण फिरावे लागणाऱ्या या भगिरथाने सरकारची कोणतीही मदत न घेता स्वत:च डोंगर पोखरुन त्यातून पाण्याचे झरे मिळविले. उंच डोंगरावर पाणी अडवा पाणी जिरवा योजना स्वत:च राबविली. त्यातून पाण्याचा स्तर वाढविला. त्यांच्या प्रयत्नांना एवढे यश आले की, मे अखेरीस देखील त्यांची विहीर पाण्याने तुडूंब भरलेली असते.
नोकरी सोडून कुळागार, बागायतीत घातले लक्ष
स्वत: जास्त शिक्षण घेतलेले नाही. परंतु, स्वत:चे व्यवस्थापन स्वत:च करणारे संजय पाटील यांनी वडिलांच्या आजारपणात गोवा बागायतदारमधील नोकरी सोडली आणि कुळागार, बागायतीत लक्ष घातले. त्यावेळी अनेकांनी त्यांना अरे वेडेपणा करु नको, असा सल्ला दिला होता. परंतु जिद्द आणि चिकाटी तसेच प्रचंड मेहनत करणाऱ्या या पाटीलने आव्हान स्वीकारले. आपल्या 10 एकर जमिनीत अनेक पोफळी लावल्या. माड लावले, डोंगरावर काजू आहेत, तिथेच अननसे लावली. पोफळीवर मिरवेली लावल्या. अधूनमधून केळीची झाडे लावली. एवढे सर्व केल्यानंतर उत्पादनाचे प्रमाण अत्यल्प राहिले. तोटा सहन करावा लागला.
‘जीवामृत’ची निर्मिती… बागायतीत वापर
त्यानंतर प्रख्यात कृषीतज्ञ सुभाष पाळेकर यांच्या सल्ल्यानुसार गोमुत्रापासून ‘जीवामृत’ तयार केले. ते झाडांना देण्यास प्रारंभ केला असता उत्पादन दुप्पट होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी 2016 पासून रु. 1 लाखाची गुंतवणूक केली. त्यातून दोन-तीन टाक्या बसविल्या. एकच गाय बाळगली. तिच्यापासून मिळणारे दूध हे दुय्यम ठरले गेले, मात्र गायीपासून मिळणारे गोमूत्र आणि शेण हे एकत्र करुन त्यातून जीवामृत तयार केले. ते टाकीत साठवून ठेवले जाते. पाच ते सहा दिवसांत ते तयार झाल्यानंतर प्रति लिटर जीवामृतमध्ये 20 लिटर पाणी या प्रमाणे हे जीवामृत एका टाकीत फिल्टर करुन सोडले जाते. तेथून सर्व झाडांना वाहिन्या लावून त्यांना हे जीवामृत पोहोचविले जाते.
उत्पादनात भरघोस वाढ
परिणामी पहिल्याच वर्षी 500 किलो वरुन सुपारी 700 किलोपर्यंत गेली. आज 6 वर्षात दीड ते पावणे दोन टन सुपारी उत्पादन घेणारे संजय पाटील सांगतात, आपण स्वत: माडांना व पोफळीना कोणतीही औषधे, फवारणी वापरीत नाही वा कोणत्याही खतांचा वापर करीत नाही. वर्षाकाठी आपल्याकडे जवळपास 50 हजार लिटर जीवामृत तयार होते. केवळ रु. 10 प्रति लिटर हा दर धरला तरी रु. 5 लाखाचे उत्पन्न होते. यातून सुपारी, शिवाय 200 माड, 15 हजार व त्यापेक्षाही जास्त नारळ मिळवून देतात. अकरावीनंतर आपण शिक्षण सोडून दिल्याने नुकसान झाले नाहीच उलट आपण केलेल्या कष्टाचे चीज झाले.
गोवा सरकारच्या ‘कृषीरत्न’चे पहिले मानकरी
आपण नेहमीच झाडांवर वेगवेगळे प्रयोग करतो व ते यशस्वी होतात. भारतीय कृषी अनुसंधान केंद्र जुने गोवेचे अनेक अधिकारी आपल्याकडे येतात. कोण सांगतो शेती बागायती नफ्यात नाही म्हणून, स्वत: राबल्यानंतर शेती वा बागायती नफ्यात कशी निघू शकते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे संजय पाटील. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काही वर्षांपूर्वी पाटील यांच्या कार्याची दखल घेतली व सरकारतर्फे जाहीर केलेल्या ‘कृषीरत्न’चे पहिले मानकरी हे संजय पाटील ठरले. अकरावीपर्यंत शिक्षण घेतले खरे परंतु, आयआयटी वाल्याचे ज्ञान! आज ते स्वत: प्लंबिंग करतात. स्वत:च ठिबक सिंचन बसविले, त्याची दुरुस्ती देखील ते स्वत:च करतात.
गंगा आली अंगणी!
एक काळ असा होता फेब्रुवारी अखेरीस पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असे. महिलांचे तर अक्षरश: हाल होत असत. आपल्याकडे सूर्यकिरण कमी पडते. आपण हे सारे दरीत कृषी वैभव निर्माण केले. जर सूर्यप्रकाश चांगल्या प्रकारे मिळाला असता तर उत्पादनाचे प्रमाण याहीपेक्षा वाढले असते, असे पाटील सांगतात. गोव्यात शेती नफ्यात येईल एवढे मुबलक पाणी आहे. आम्ही त्यातले केवळ 10 टक्के पाणी वापरतो व उर्वरित पाण्याचा वापर आपसूकच गावातील इतरांना होतो. आमच्याच डोंगरावर आम्ही पाणी अडवा, पाणी जिरवा योजनेंतर्गत अनेक ठिकाणी चर मारले. तसेच छोटे बंधारे तयार केले. पावसाळ्dयात त्यात पाणी राहते. पावसाळ्dयानंतर आम्हाला ते झऱ्यातून प्राप्त होते मात्र त्यासाठी आपण एका केरळमधील कामगाराच्या साहाय्याने स्वत: डोंगरात 135 मीटर खोदत आत घुसलो. तिथे हवा देखील मिळत नाही. बोगद्याप्रमाणेच खोदत गेलो. अखेरीस किंचित पाणी मिळाले. असाच आणखी एक छोटेखानी बोगदा काढला. त्यातून येणारे पाणी झिरपून खाली आले. त्यापुढे एक सिमेंटची विहिर तयार केली. त्यात हे पाणी सोडले. त्याबाजूला पंपसेट बसविले. त्यातून डोंगरावर स्प्रिकर्ल्स बसविले. तिथे अननस उत्पादन घेतले. त्यातून झिरपून येणारे पाणी पुन्हा झऱ्यातून विहिरीत, यातून पाण्याचा स्तर वाढला. आता ज्यांच्या बागायती कोरड्या होत्या त्यांच्यापर्यंत पाण्याचा स्तर वाढत गेला. खरेच सांगतो! दारात गंगा अवतरल्याचे समाधान झाले. सरकारकडे पाण्यासाठी कोणतीही याचना केली नाही. आम्हीच शोधून काढले पाणी! त्यासाठी मला देखील ‘भगिरथ’ व्हावे लागले, संजय पाटील म्हणाले.
थोडे कष्ट घेतले आणि सेवेशी प्रामाणिक राहिले तर काय अशक्य आहे! संजय पाटील यांची ही यशोगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी तर आहेच शिवाय कृषी क्षेत्रात आदर्श आहे. सरकारकडून ही मदत मिळत नाही. कामगार मिळत नाही अशा कोणत्याही तक्रारी ते करीत नाहीत. थोडे डोके वापरले तर कोणत्याही समस्येवर उपाय काढता येतात. कामगार मिळत नसल्याने त्यांनी पोफळी, माड व इतर झाडांना आवश्यक खत हे जीवामृत! ते देखील थेट झाडाच्या मुळाशी, थेट टाकीतून! ठिबक सिंचनाद्वारे. त्यामुळेच इतर कोणत्याही बागायतदारांच्या तुलनेत पाटीलांच्या कुळागारातील पोफळीचे बुंधे हे केवढेतरी मोठे. फणस, आंबा, काजू, हळद अशी अनेक उत्पादने घेणारे संजय पाटील प्रसन्न मुद्रेने स्वागत करतात. त्यांची पत्नी सुशिला या त्यांना मदत करतात. कन्या सुजला व पुत्र सुमय खडतर मार्गातून दररोज बाहेर जऊन शिक्षण घेऊन पूर्ण करणारे. त्यांच्या या गावातून मूळ सावईवेरेला घाटी पार करुन जातात. जीवनासमोर उद्दिष्ट ठेवल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे संजय पाटील यांच्या कर्तृत्वाने दिसून येते.