बांगलादेशातील हिंदूंच्या संरक्षणाचे दिले आश्वासन
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बांगलादेशचे अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. बांगलादेशने भारताला हिंदूंचे संरक्षण करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच भारताने बांगलादेशातील हिंदू आणि सर्व अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी आपल्या समर्थनाचा पुनऊच्चार केला. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. 5 ऑगस्ट रोजी शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडल्यानंतर अल्पसंख्याक समुदायाला 48 जिल्ह्यांतील 278 ठिकाणी हल्ले आणि धमक्मयांचा सामना करावा लागला आहे.
भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी हिंसाचारग्रस्त बांगलादेशातील परिस्थिती लवकरच सामान्य होईल अशी आशा व्यक्त केली. शेजारील देशातील हिंदू आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबत 140 कोटी भारतीय चिंतेत असल्याचे ते म्हणाले होते. लाल किल्ल्यावरून आपल्या भाषणात भारत शांततेसाठी कटिबद्ध असल्याचे सांगताना बांगलादेशच्या विकासाच्या प्रवासात त्यांना नेहमीच सहकार्य केले जाईल असे स्पष्ट केले.
बांगलादेशात शेख हसीना सरकार पडल्यानंतर हिंदू समुदायाच्या सदस्यांविरुद्ध हिंसाचार वाढला आहे. नोकऱ्यांमधील वादग्रस्त आरक्षण व्यवस्थेवरून त्यांच्या सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने झाल्यानंतर पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर हसीना यांनी 5 ऑगस्ट रोजी देश सोडत भारतात प्रवेश केला होता.