नागरिक कंटाळले की प्रश्नच संपले? : पोलिसांना मिळाली विश्रांती
बेळगाव : पाणी, गटारी, रस्ते, जमीन यासह इतर समस्यांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध संघटना मोर्चा काढत असतात. मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांकडे समस्या सोडविण्यासाठी निवेदन देतात. सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस असल्यामुळे त्या दिवशी मोठ्या संख्येने संघटना दाखल होतात. सोमवार दि. 6 रोजी एकही संघटना निवेदन देण्यासाठी फिरकली नाही. आठवड्याचा पहिला दिवस हा आंदोलनाविनाच गेला. त्यामुळे पोलिसांना काहीसा दिलासा मिळाला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर दरवेळी आंदोलकांची गर्दी होऊन निवेदनांचा पाऊस पडतो. मात्र यावेळचा सोमवार याला अपवाद ठरला. दिवसभरात एकही आंदोलन झाले नाही किंवा निवेदनही देण्यात आले नाही. अशाप्रकारे या फेब्रुवारी महिन्याचा पहिला सोमवार आगळा ठरला. दरवेळी आंदोलने करून आणि निवेदने देऊन प्रश्न सुटत नाहीत म्हणून नागरिक कंटाळले की समस्या आणि प्रश्नच संपले, असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला.
प्रत्येक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय आंदोलकांनी गजबजलेले असते. आंदोलकांचे प्रश्न समजावून घेत निवेदने स्वीकारताना जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासनाची तारांबळ उडालेली असते. काहींना थेट जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आपली दाद मागायची असते. यामुळे ते अडून बसलेले असतात. उर्वरित संघटना जिल्हाधिकारी कार्यालयात उपलब्ध असतील तर ठीक अन्यथा अप्पर जिल्हाधिकारी किंवा तेही नसतील तर शिरस्तेदारांकडे निवेदने सादर करून मोकळे होतात. आंदोलकांच्या भाऊगर्दीत प्रसिद्धीचा उद्देश ठेवून येणाऱ्यांची संख्याही मोठी असते. यामुळे आवार गजबजलेले असते. आठवड्यातील इतर दिवशीही आंदोलक येत असतात. मात्र सोमवारच्या तुलनेत त्यांची संख्या कमी असते. सोमवार दि. 6 रोजी मात्र एकही आंदोलन झाले नाही. शिवाय एकही निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात दिले गेले नाही. ज्याप्रमाणे नित्यनेमाने आंदोलक जमतात त्याचप्रमाणे त्यांची निवेदने घेऊन वाचा फोडण्यासाठी पत्रकारांची संख्याही मोठी असते. या सोमवारी मात्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित पत्रकारांना एकही आंदोलन नसल्याने आश्चर्य वाटले. सोमवारी महापौर व उपमहापौर निवडणूक असल्यामुळे सारे तिकडेच गुंतले होते.
एकंदर जिल्हाधिकारी कार्यालयातही शुकशुकाटच होता. कोणीही आंदोलक न आल्याने अप्पर जिल्हाधिकारी व शिरस्तेदारांनाही हालचाल करावी लागली नाही. विशेष म्हणजे दिवसभरात कोणतीही महत्त्वाची बैठक झाली नाही. यामुळे सोमवार असूनही सुटीचा अनुभव येत होता. कार्यालयीन कामकाज वगळता विशेष असे काहीच न झाल्याने सोमवार सुखाचा गेल्याचेच वातावरण परिसरात पाहावयास मिळाले. सध्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्याचे काम सुरू आहे. ते काम अर्धवट स्थितीतच बंद करण्यात आले आहे. या परिसरात खोदाई झाल्यामुळे पार्किंगची समस्या गंभीर बनत चालली आहे. पोलिसांना आंदोलकांबरोबरच पार्किंगवरही नजर ठेवावी लागत आहे. वारंवार वाहतुकीची कोंडीही होत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. एकूणच पोलिसांना दररोज धावपळ करावी लागते. मात्र सोमवारी आंदोलक आले नसल्यामुळे पोलिसांना काहीशी विश्रांती मिळाली होती.