ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मान्सून 1 जूनला केरळमध्ये दाखल होत असतो. पण यावर्षी मान्सूनचे आगमन लवकर झाले आहे. आज केरळात मान्सून दाखल झाला असून, शेतकऱ्यांसह सर्वांसाठी ही आनंदवार्ता आहे. 7 ते 8 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
16 मे रोजी मान्सून अंदमानात दाखल झाला होता. त्यानंतर यंदा मान्सून वेळेआधी केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार मान्सून आज केरळमध्ये दाखल झाला आहे. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर तो पुढील 6 ते 7 दिवसांमध्ये तळकोकणात आणि महाराष्ट्रात दाखल होत असतो. त्यानुसार 7 ते 8 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दरम्यान, मान्सून केरळमधील कन्नूर, पल्लकड आणि मदूराईमध्ये दाखल झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद झाली आहे. मान्सून आगमन जाहीर करताना भारतीय हवामान विभागाचे काही निकष असतात. ते निकष पूर्ण झाल्याने मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये केरळच्या उत्तरेकडे परिस्थिती अनुकूल नाही. सध्या वाऱ्यांची दिशा वायव्येकडून आहे. ती नैऋत्येकडून असणे गरजेचे आहे. त्यामुळे लगेच मोठय़ा पावसाची अपेक्षा ठेवणं योग्य ठरणार नसल्याचेही हवमान विभागाने म्हटले आहे.