पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडय़ाचा बहुतांश भाग व्यापत गुजरातेत सोमवारी प्रवेश केला. मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असून, तो दोन दिवसांत विदर्भाचा काही भाग तसेच मध्य प्रदेशात प्रवेश करणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
मान्सूनची पश्चिम शाखा आता सक्रिय झाली असून, तिने गेल्या चार ते पाच दिवसांपासून पश्चिम किनारपटी्, गोवा, कर्नाटकाचा बहुतांश भाग, मराठवाडा-मध्य महाराष्ट्राचा बहुतांश भाग व्यापत सोमवारी गुजरातेत प्रवेश केला. अरबी समुद्राचा बहुतांश भाग, तामिळनाडूचा बहुतांश भाग, पश्चिम बंगाल तसेच बिहारचा बराचसा भाग मोसमी वाऱ्यांनी आपल्या कवेत घेतला आहे. दीव, नंदुरबार, जळगाव, परभणी, बिदर, तिरुपती, पाँडेचरी अशी मान्सूनची रेषा आहे.
पुढील दोन दिवस मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असून, तो उत्तर अरबी समुद्राचा काही भाग, गुजरातचा आणखी काही भाग, दक्षिण मध्य प्रदेशचा भाग, संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटक, तामिळनाडू, विदर्भाचा काही भाग, तेलंगणा,आंध्र प्रदेशचा आणखी काही भाग, उत्तर पश्चिम बंगालच्या उपसागराचा भाग व्यापण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
आसाम, अरुणाचल प्रदेशला अतिवृष्टीचा इशारा
नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे आसाम तसेच अरुणाचल प्रदेशमध्ये पुढील तीन दिवस ‘रेड अलर्ट’ अर्थात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यापूर्वीही आसामला पावसाने झोडपले होते. यात बरेचसे नुकसान झाले आहे. आता पुन्हा या भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने चिंतेत वाढ झाली आहे.
महाराष्ट्र गोव्यात पुढील दोन दिवस पाऊस
दरम्यान, महाराष्ट्र तसेच गोव्याच्या भागात पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. याशिवाय कर्नाटक किनारपट्टी तसेच केरळातही पावसाचा जोर राहील.