गोव्याची सीमा ओलांडून कोकणात दमदार हजेरी
प्रतिनिधी/ रत्नागिरी
गेल्या अनेक दिवसांपासून खोळंबलेला… हवामान विभागाच्या अंदाजाला हुलकावणी देणारा…आणि बळीराजासह साऱयांनाच हवाहवासा असलेल्या मान्सूनने अखेर शुक्रवारी कोकणासह रत्नागिरीतही हजेरी लावली. जोरदार वारा…विजांच्या कडकडाटात जिल्हाभरात दुपारनंतर धुवाँधार पाऊस कोसळला. प्रचंड उकाडय़ाने हैराण झालेल्या साऱयांनाच हा पहिला मान्सून चिंब करून गेला.
नवसृजन व नवचैतन्याचा पावसाळा अनुभवण्यासाठी प्रत्येक कोकणवासी आतूरला होता. मान्सून कोकणात दाखल झाला की, येथील सारे वातावरणच बदलून जाते. पण यावर्षी मान्सूनचे आगमन काहीसे लांबणीवर गेले होते. गोव्याच्या वेशीपर्यंत येऊन थबकलेला मान्सून पुढे कोकणात येण्यासाठी अनुकूल स्थिती नव्हती. मात्र 10 जून रोजी गोव्याची वेस ओलांडून वेंगुर्लामार्गे मान्सून शुक्रवारी कोकणात दाखल झाला आहे.
रत्नागिरीत शुक्रवारी सकाळपासूनच पावसाला अनुकूल वातावरण होते. सकाळच्या वेळेत जिह्यातील अनेक भागात पावसाच्या तुरळक सरींचा शिडकावा झाला. मात्र त्यानंतर कडाक्याचे उन पडले होते. रत्नागिरी परिसरात दुपारपासून पुन्हा आभाळ दाटून आले व सायंकाळी 5.30 च्या सुमारास सोसाटय़ाच्या वाऱयासह पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी नागरिकांची धावपळ झाली.
पाऊस कधी येणार व तो वेळेवर येणार का, यासारख्या प्रश्नांनी बळीराजाच्या मनावर गारुड घातले होते. मात्र आता प्रत्यक्ष मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला आहे. अनेक भागात पूर्वमोसमी पावसामुळे खरीपाच्या पेरण्यांना प्रारंभ झाला होता. मात्र काही भागात खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. या पेरण्यांनंतर शेतीच्या कामांना दमदार पावसाच्या आधारे गती येणार आहे. आता दाखल झालेल्या मान्सूनमुळे बळीराजा शेतीच्या कामांमध्ये गुंतून जाणार आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून कोकणात वेळेवर दाखल झाला नसला तरी पर्जन्यमानातील तूट पाऊस भरून काढतो का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान हवामान विभागाने आपला अंदाज कायम ठेवला असून 11 ते 14 जूनदरम्यान कोकणासह दक्षिण किनारपट्टीवर सोसाटय़ाचा वारा, विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.