अरबी समुद्रात हवामानाचा दाब वाढल्याने पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील कोल्हापूर , सांगली, सातारा, सोलापूर या मध्य महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांसह परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या नऊ जिल्ह्यांना १६ ते १९ मे पर्यंत चार दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,बीड या चार जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस होईल अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
अंदमानसह निकोबार आणि बंगालच्या उपसागरात येत्या २४ तासांत कोणत्याही क्षणी मान्सून धडकणार आहे. त्याचबरोबर विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह केरळ,तामीळनाडू आणि लक्षद्वीप बेटांवर अतिवृष्टी होणार आहे. त्यामुळे या राज्यांना हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मान्सून या वर्षी आठवडाभर आधीच येणार आहे. पुढील पाच दिवसांत नैऋत्य मोसमी वारे अधिक बळकट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील २४ तासांत या ठिकाणी ६४.४ मिमी ते ११५.४ मिमी पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, केरळ किनारपट्टीवर पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
सध्या दक्षिण भारतामध्ये मुसळधार पाऊस पडत असून, राज्यातील काही जिल्ह्यांतही जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मान्सून अंदमानच्या दिशेने निघाल्याने दक्षिण भारतात मुसळधार पाऊस सुरू आहे. केरळात अतिवृष्टी सुरू असून आसाम, मेघालय आणि पश्चिम बंगालमध्येही जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. उत्तर भारतात मात्र उष्णतेची लाट कायम असून तेथील कमाल तापमानाचा पारा ४५ ते ४९ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. गुजरात,मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील विदर्भात तापमान ४० ते ४४ अंश सेल्सिअस असल्याची माहिती वेधशाळेकडून माहिती देण्यात आली आहे. .
या जिल्ह्यांना येलो ॲलर्ट
राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या मध्य महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांसह परभणी, हिंगोली नांदेड, लातूर, उस्मानाबाद या नऊ जिल्ह्यांना १६ ते १९ मे पर्यंत चार दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा (येलो ॲलर्ट ) हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड या चार जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस होईल, अशी शक्यताही वर्तविण्यात आली आहे.