चंदीगड
पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाचे वडिल बलकौर सिंह यांनी पंजाब विधानसभेबाहेरील धरणे आंदोलन समाप्त केले आहे. मुलाच्या मारेकऱयांना पकडण्यात न आल्याप्रकरणी बलकौर सिंह यांनी राज्यातील आम आदमी पक्षाच्या सरकारवर टीका केली आहे. 20 मार्चनंतर मुख्यमंत्री भगवंत मान भेट घेतील असे आश्वासन मंत्री कुलदीप सिंह धालीवाल यांनी दिल्यावर बलकौर सिंह यांनी स्वतःचे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्री धालीवाल यांच्याकडेच तुरुंग विभाग आहे, तरीही तुरुंगात सिद्धू मूसेवालाचे मारेकरी मारले गेले. तर सिद्धूच्या हत्येच्या कटातील सूत्रधारांवर आम आदमी पक्षाचे सरकार कुठलीच कारवाई करत नसल्याचा आरोप बलकौर सिंह यांनी केला आहे. बलकौर सिंह हे मागील 10 महिन्यांपासून न्यायाची मागणी करत आहेत. सध्या पंजाब विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे.