प्रोत्साहनपर अनुदानासाठी शेतकरी रस्त्यावर : ‘स्वाभिमानी’ची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक : 9 ऑगस्टपर्यंत अनुदान जमा करा, अन्यथा महामार्ग रोखणार : माजी खासदार राजू शेट्टी यांचा इशारा
प्रतिनिधी/कोल्हापूर
प्रोत्साहनपर अनुदानाची केवळ घोषणा नको तर तत्काळ खात्यात पैसे जमा करा, यामागणीसाठी बुधवारी संततधार पावसात शेतकऱ्यांनी आक्रोश केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हय़ातील शेतकरी मोठय़ासंख्येने रस्त्यावर उतरत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी प्रोत्साहनपर अनुदानासाठी प्रशासनाने घातलेल्या जाचक अटी रद्द करुन नियमित कर्जफेड करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना 9 ऑगस्ट क्रांती दिनापर्यंत अनुदानाचे पैसे द्या, अन्यथा पुणे-बंगळूर महामार्ग रोखण्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला
प्रोत्साहनपर अनुदान, ऊसाचा दुसरा हप्ता दोनशे रुपये द्या, दिवसा वीज पुरवठा, खतांचे वाढलेले दर कमी करा आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. ऐतिहासिक दसरा चौक येथून दुपारी मोर्चाला सुरवात झाली. व्हिनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा आला. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष जालिंदर पाटील, सावकार मादनाईक आदी उपस्थित होते.
माजी खासदार शेट्टी म्हणाले, तत्कालीन महाविकास आघाडी सरकारन प्रोत्साहन पर अनुदान देण्याची घोषणा अडीच वर्षांपुर्वी केली. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतुद केली. 1 जुलैला शेतकऱयांच्या खात्यावर पैसे जमा होणार तोच ठाकरे सरकार पडणार हे लक्षात आल्याने प्रशासनातील अधिकाऱयांनी अनुदानापासून शेतकरी वंचित राहतील अशा पद्धतीने जाचक अटी घातल्या. अटींमुळे जिल्हय़ातील 92 टक्के शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे जाचक अटी रद्द करुन शेतकऱयांना तत्काळ 50 हजार रुपये देण्याची मागणी शेट्टी यांनी केली.
शिंदे साहेब ही फक्त झलक
पुढील दोन दिवसात मुंबईला जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. यावेळी त्यांना कोल्हापुरातील या विराट आक्रोश मोर्चाचे छायाचित्र दाखवून प्रोत्साहनपर अनुदान, एकरकमी एफआरपी आणि खतांचे दर कमी करण्याबाबत चर्चा करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. तसेच शिंदे साहेब हि फक्त एक झलक आहे. शेतकऱयांच्या प्रश्नांवर सकारात्मक विचार न झाल्यास प्रत्येक जिल्हय़ात अशा पद्धतीने शेतकरी रस्तावर उतरतील असा इशाराही त्यांनी दिला.
ट्विटरच्या टिव टिववर विश्वास नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विरवरुन जाचक अटी रद्द केल्याची घोषणा केली. मात्र ट्विटरच्या टिव टिववर आता शेतकऱयांचा विश्वास नाही. त्याची अंमलबजावणी तत्काळ करा. शेतकऱयांच्या खात्यात तत्काळ पैसे जमा करा, शेतकरी तुम्हाला आशिर्वादच देतील असेही शेट्टी म्हणाले.
गृहपाठ करुन तरी जायचं
अनुदानासंदर्भात दोघे प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांना भेटले. यामधली एकाच्या मातोश्री तर दुसऱ्याचा भाऊ जिल्हाबँकेमध्ये संचालक आहे. भेटीदरम्यान निवेदन देवून त्यांनी केवळ पूरग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याची मागणी केली. सलग तीन वर्ष कर्जाची अट त्यांना माहिती नाही. त्यामुळे निदान जिल्हा बँकेतून माहिती घेवून मुख्य़मंत्र्यांना भेटण्यासाठी गृहपाठ तरी करुन जायच, असा टोला शेट्टी यांनी खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आबिटकर यांना नाव न घेता लगावला.
एकररकमी एकआरपी, दुसरा हप्ता दोनशे घेणारच
ब्राझीलमधील साखरेचे उत्पादन घटल्याने देशातील साखरेला मागणी वाढली आहे. त्यामुळे मोठयाप्रमाणात भारतातून साखर निर्यात होत आहे. यामुळे कारखान दारांनाही चांगले पैसे मिळाले आहेत. त्यामुळे कारखानदारांकडून कोणत्याही परिस्थितीत दुसरा हाप्ता 200 रुपये घेणारच असा निर्धार यावेळी शेट्टी यांनी केला. तसेच महाविकास आघाडीने केलेल्या एफआरपीच्या तुकडय़ांचा निर्णाय मागे घेवून पुढील हंगामात एकरकमी एफआरपी घेतल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
अडीच वर्ष कुठे होता
काही जणांना आत्ता शेतकऱ्यांचा कळवळा आला. त्यामुळे त्यांनी अनुदानाबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. गेली अडीच वर्ष तुमचाच मुख्यमंत्री असताना तुम्ही कोठे होता. आत्ताच निवेदन देवून शेतकऱ्यांची सहानभुती मिळणार नाही, असा टोला खासदार धैर्यशील माने यांना सावकार मादनाईक यांनी नाव न घेता लगावला. तसेच शेतकऱयांच्या प्रश्नांबाबत लवकर सकारात्मक निर्णय घ्या, अन्यथा ही शेतकऱ्यांची फौज विधानभवनाच्या दारात यायलाही कमी पडणार नाही, असा इशारा शिंदे सरकारला दिला.