शासकीय शाळांमधील प्रवेश वाढले : बिहार-बंगालमध्ये खासगी शिकवण्यांचे प्रमाण अधिक
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
देशाच्या ग्रामीण भागांमधील शिक्षणाचे नवे चित्र समोर आले आहे. गावांमध्ये आता 98.4 टक्के मुले शाळेत जात आहेत. पहिल्यांदाच हा आकडा 98 टक्क्यांहून अधिक झाला आहे. 2018 मध्ये हे प्रमाण 97.2 टक्के राहिले होते. तर 2022 मध्ये सरकारी आणि खासगी शाळांमध्ये इयत्ता 5 वीपर्यंतचे 42.8 टक्के विद्यार्थीच इयत्ता दुसरीची पुस्तके वाचू शकले आहेत. 2018 मध्ये हा आकडा 50.5 टक्के राहिला होता. 2012 मध्ये हे प्रमाण 46.9 टक्के इतके होते.
खासगी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱया विद्यार्थ्यांची संख्या घटल्याचे अहवालातून समोर आले आहे. तर शासकीय शाळांमध्ये मुलांचा प्रवेश वाढला आहे. 4 वर्षांपूर्वी म्हणजेच 2018 मध्ये 30.9 टक्के मुले खासगी शाळेत शिकत होती, परंतु 2022 मध्ये हे प्रमाण 25 टक्क्यांवर आले आहे. शासकीय शाळांमध्ये प्रवेश घेणाऱया 6-14 वयोगटातील मुलामुलींचे प्रमाण 72.9 टक्के झाले आहे. 2018 मध्ये हा आकडा 66 टक्के होता.
देशभरातील शाळांमध्ये शिक्षकांच्या उपस्थितीत सुधारणा झाली आहे. 2022 मध्ये शिक्षकांची उपस्थिती 87 टक्के नोंद झाली. 2018 मध्ये हा आकडा 85.4 टक्के होता. तर विद्यार्थ्यांची उपस्थिती 72 टक्के आहे. 7-10 वयोगटातील सर्वाधिक 99 टक्के मुलांनी शाळेत प्रवेश घेतला आहे. तर 11-14 वयोगटातील 98 टक्के मुले शाळांमध्ये प्रवेशाप्रकरणी दुसऱया क्रमांकाव राहिले आहेत. 2022 मध्ये 69 टक्के शाळांमध्ये क्रीडामैदान तयार करण्यात आले. तर 2018 मध्ये 66.5 टक्के शाळांमध्येच क्रीडामैदान होते. 50 टक्के मुलांच्या आई आणि 80 टक्के मुलांच्या वडिलांनी इयत्ता पाचवीपेक्षा अधिकचे शिक्षण घेतलेले असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे.
शिक्षणाची गुणवत्ता चिंताजनक
देशात मुलांच्या तुलनेत मुली अधिक हुशार आहेत. 8 वीपर्यंतच्या 71.3 टक्के मुली इयत्ता दुसरीची पुस्तके वाचू शकतात, तर अशा मुलांचे प्रमाण 67.6 टक्के आहे. 2018 मध्ये शासकीय-खासगी शाळांमध्ये 5वीत शिकणारी 50.5 टक्के मुलेच इयत्ता दुसरीची पुस्तके वाचू शकत होती, 2022 मध्ये हे प्रमाण 42.8 टक्क्यांवर आले आहे. हा आकडा 2012 च्या 46.9 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. 8 वीत शिकणाऱया 23 टक्के मुलांना केवळ वजाबाकी येते. 26 टक्के मुलांना 11-99 मधील क्रमांक ओळखता आले. इयत्ता तिसरीच्या 9.8 टक्के मुलांना 1-9 पर्यंतचे अंक ओळखता आले.
भागाकारात केरळचे विद्यार्थी पिछाडीवर
पंजाबमध्ये 8 वीतील 44.5 टक्के विद्यार्थीच भागाकार करण्यास सक्षम आहेत. हरियाणात अशा विद्यार्थ्यांची संख्या 49.5 टक्के आहे, तर केरळमध्ये 39.9 टक्के मुलेच भागाकार करू शकतात. राजस्थानात इयत्ता 5 वीतील केवळ 6.3 टक्के मुलांनाच भागाकार करणे जमते. तर केवळ 4.9 टक्के मुलांनाच वजाबाकी करणे येते. मणिपूरमध्ये 45.2 टक्के मुले भागाकार करू शकतात. मध्यप्रदेशात इयत्ता तिसरीतील 9.5 टक्के, झारखंड-छत्तीसगडमधील 16 टक्के, गुजरातमध्ये 23 टक्के, बिहारमध्ये 21 टक्के आणि पंजाबमध्ये 31 टक्के विद्यार्थ्यांनाच वजाबाकीचे ज्ञान आहे. 56 टक्क्यांसह मणिपूरमधील विद्यार्थी यात आघाडीवर आहेत.
खासगी शिकवण्यांचे लोण
देशात इयत्ता पहिलीपासून आठवीपर्यंतचे 30.5 टक्के विद्यार्थी खासगी शिकवण्यांचा आधार घेतात. 2018 मध्ये हा आकडा 26.4 टक्के होता. उत्तरप्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये 2018 च्या तुलनेत 2022 मध्ये खासगी शिकवणीत जाणाऱया विद्यार्थ्यांचे प्रमाण 8 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. कोरोनानंतर गावांमध्ये शिकवणी घेत स्वतःचा खर्च भागविणाऱया युवक-युवतींची संख्या वाढली आहे. गुजरातमध्ये खासगी शिकवणीचा आधार घेणाऱया विद्यार्थ्यांची संख्या 5 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे.
कोरोना संकटाचा प्रभाव
कोरोना महामारीमुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रतिकूल प्रभाव पडला आहे. याचमुळे खासगी आणि शासकीय शाळांमधील 31 टक्के विद्यार्थी खासगी शिकवण्यांवर निर्भर आहेत. बिहारमध्ये अशा विद्यार्थ्यांचे प्रमाण 71.5 टक्के आणि पश्चिम बंगालमध्ये 74 टक्के आहे. तर राजस्थानात सर्वात कमी 4.6 टक्के मुले खासगी शिकवण्यांवर निर्भर आहेत. ऍन्युएल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट 2022 मधून ही आकडेवारी समोर आली आहे. 616 जिल्हय़ांमधील 19,060 गावांमध्ये 7 लाख मुलांवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून हे निष्कर्ष प्राप्त झाले आहेत.