देखभालीकडे दुर्लक्ष, नागरिक शुद्ध पाण्यापासून वंचित
प्रतिनिधी /बेळगाव
जनतेला शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी शहरात उभारण्यात आलेली जलशुद्धीकरण केंदे कुचकामी ठरू लागली आहेत. त्यामुळे शासनाच्या लाखो रुपयांचा चुराडा होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
शहरातील फेरीवाले, मजूर आणि बाहेरून येणाऱया नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुमारे 1.20 कोटी रुपयांची तरतूद करून जलशुद्धीकरण केंदे उभारण्यात आली आहेत. शहरात 12 ठिकाणी शुद्ध पाण्याची ही केंदे सुरू करण्यात आली आहेत. मात्र नियोजनाअभावी जलशुद्धीकरण केंद्रे बंद आहेत. या केंद्रांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी एका खासगी एजन्सीकडे सोपविण्यात आली आहे. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने केंद्रातील साहित्य खराब झाले आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी जवळच्या हॉटेलवर अवलंबून रहावे लागत आहे.
सुरुवातीच्या काळात ही जलशुद्धीकरण केंदे सुरळीत सुरू होती. मात्र त्यानंतर अनुदानाच्या अभावी यांना उतरती कळा लागली. बहुतांशी जलशुद्धीकरण केंदे वापराविना पडून असल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन पूर्ववत जलशुद्धीकरण केंदे सुरू करावीत, अशी मागणी होत आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात 12 ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत. शुद्धीकरण केंद्राच्या देखभालीसाठी मनपाला वर्षाकाठी सुमारे 50 ते 60 हजार रुपयांचा महसूल मिळतो. मात्र अद्याप देखभाल होत नसल्याचे समोर येत आहे आणि त्यामुळेच जलशुद्धीकरण केंद्राची परिस्थिती बिकट बनली आहे.
खासगी एजन्सीला नोटीस
जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभालीसाठी खासगी एजन्सीला यापूर्वीच वर्कऑर्डर देण्यात आली आहे. तीन जलशुद्धीकरण केंदे सुरळीत सुरू करण्यात आली आहेत. शिवाय उर्वरित 9 जलशुद्धीकरण केंद्रांच्या दुरुस्तीचे काम शिल्लक आहे. खासगी एजन्सीला याबाबत नोटीस देण्यात आली आहे.
– रुदेश घाळी (मनपा आयुक्त)