जत/प्रतिनिधी
जत शहरातील विजापूर गुहागर मार्गालगतच्या सोलनकर चौक येथे एका भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने तिघांना चिरडले. यात एक तरुण जागीच ठार झाला. तर अन्य दोन जण जखमी झाले आहेत. सतीश ऊर्फ पप्पू आप्पासाहेब माळी (वय २१, रा.छत्रीबाग रोड जत) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. या अपघातात सतीशचे मित्र मायाप्पा शिवाजी बर्वे (वय. ३२) व सागर बाळू धाईगडे (वय.२१) दोघेही ( रा. जवळा ता. सांगोला) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जत शहरातून जाणाऱ्या विजापूर व गुहागर महामार्गावरील सोलनकर चौक येथे नेहमी वाहतुकीची वर्दळ असते. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास याच ठिकाणी सांगोला-जत राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने सतीश माळी यांच्या मोटरसायकलला धडक दिली. यात सतीश हे कंटेनरच्या पाठीमागल्या चाकाखाली चिरडून जागीच ठार झाले. तर मायाप्पा बर्वे व सागर धाईगडे हे जखमी झाले. सतीश व त्याचे मित्र हे शहरातून शेगावकडे जाणाऱ्या सांगोलेच्या दिशेने जात होते.
हे ही वाचा : बंधाऱ्यावर काम करणाऱ्या मजुराची आत्महत्या
दरम्यान, आपघात झाल्याचे समजताच नागरिकांनी येथे मोठी गर्दी केली होती. सामाजिक कार्यकर्त्यांनी व पोलिसांनी सतीश माळी यांना जत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सदाकाळे यांनी माळी हे मयत झाल्याचे घोषित केले. तर यात गंभीर जखमी झालेले मायाप्पा बर्वे व सागर धाईगडे मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोघेही गंभीररित्या जखमी झाले आहेत. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला आहे. दरम्यान कंटेनर चालवणारा चालक हा फरार झाला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक लक्ष्मण बंडगर करत आहेत.