रेल्वेफाटकावरील गर्दीतून जाणे टाळण्यासाठी पुलावरून प्रवास
प्रतिनिधी /बेळगाव
तिसऱया रेल्वेफाटकावर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास आले आहे. मात्र अद्याप उड्डाणपुलाचे उद्घाटन झालेले नाही. पण उद्घाटनापूर्वीच वाहनांची वर्दळ सुरू झाली आहे. तर दोन्ही बाजूंनी रस्ता खुला असल्याने वाहनधारक ये-जा करीत आहेत. त्यामुळे उड्डाणपुलाचे अधिकृत उद्घाटन होणार नाही का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
शहरातील विविध रेल्वेफाटकांवर उड्डाणपुलांची उभारणी करण्यात आली आहे. मात्र सर्वाधिक अवधी तिसऱया रेल्वेफाटकावरील पूल उभारणीसाठी लागला आहे. तब्बल चार वर्षे हे काम सुरू असून अद्यापही उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले नाही. या उड्डाणपुलाचे काम कासवगतीने सुरू असल्याने ते कधी पूर्ण होणार? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत होता.
तिसऱया रेल्वेफाटकाजवळ वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने वाहनधारकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. अखेर उड्डाणपुलाच्या उभारणीचे काम पूर्ण झाले असून रंगरंगोटी, विद्युत पथदीप बसविणे, पुलावरील डांबरीकरण आदी कामे अलीकडेच पूर्ण झाली आहेत.
उड्डाणपुलाच्या उद्घाटनाची प्रतीक्षा
मात्र उड्डाणपुलाच्या उद्घाटनाची प्रतीक्षा करावी लागत आहे. पण उड्डाणपुलावर जाणारा रस्ता खुला असल्याने दुचाकी वाहनधारक उड्डाणपुलावरून ये-जा करीत आहेत. उद्घाटनापूर्वीच वाहनधारकांनी ये-जा करण्यास सुरुवात केली आहे. तिसऱया रेल्वेफाटकावर होणाऱया गर्दीमुळे वाहनधारक पुलावरून जाणे पसंत करीत आहेत. त्यामुळे उद्घाटनाची प्रतीक्षा न करताच वाहनधारकांनी उड्डाणपुलाचा वापर सुरू केला आहे.