डंपरचालकाला नागरिकांनी विचारला जाब
प्रतिनिधी /बेळगाव
वडगाव-यरमाळ या रस्त्यावर मागील दीड वर्षांपासून मातीचे ढिगारे टाकले जात आहेत. यामुळे येणे-जाणेही अडचणीचे झाले आहे. या संदर्भात माती टाकणाऱ्या डंपरचालकाला जाब विचारला असता एका कंत्राटदाराचे नाव सांगून रूंदीकरणासाठी माती टाकत असल्याचे सांगितले. परंतु वर्षभरापासून माती टाकून काम का बंद आहे. असे विचारताच त्या डंपरचालकाने तेथून काढता पाय घेतला.
वडगाव-यरमाळ या 6 कि. मी. रस्त्याचे डांबरीकरण 12 ते 13 वर्षापूर्वी करण्यात आले. त्यानंतर किरकोळ डागडुजी केली जात होती. हा रस्ता पुन्हा एकदा करण्यासाठी मंजूर होवून वर्ष उलटले तरी अद्याप तो झालेला नाही. त्यामुळे रस्त्यात मोठमोठे ख•s पडून रस्त्याची चळण झाली आहे. काही ठिकाणी लाल माती घालून रस्ता सपाट करण्यात आला आहे. वर्षभरापासून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा काम केले जात असल्याने शेतकरी व नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
या रस्त्यावरून शहापूर शिवारातील शेतकरी, अवचारहट्टी, देवगणहट्टी, यरमाळ या गावचे नागरिक ये-जा करतात. परंतु बळ्ळारी नाल्यापासून शहापूर तळ्यापर्यंत ठिकठिकाणी मातीचे ढिगारे टाकण्यात आले आहेत. मातीचे ढिगारे रस्त्यावरच टाकल्याने मोठी वाहने येण्यास अडथळे निर्माण होत आहेत. मातीचे ढिगारे कोण टाकत आहेत, या संदर्भात कोणालाच माहिती नव्हती. रविवारी एक डंपर माती टाकत असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी डंपरचालकाला जाब विचारला. त्यावेळी एका कंत्राटदाराने माती टाकण्यास सांगितले असल्याचे सांगत तेथून काढता पाय घेतला. कंत्राटदाराच्या अशा मनमानी कारभारामुळे नागरिकांचा जीव मात्र धोक्यात आला आहे.