राजकीय नेत्यांनी उचलला विडा : प्रामुख्याने हणजूण पोलीस स्थानक निरीक्षक, पोलीस उपअधीक्षक रडावर
प्रतिनिधी /म्हापसा
प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली फोगट प्रकरणी या ना त्या कारणावरून हणजूण पोलीस स्थानक व येथील अधिकारी व वरिष्ठ अधिकारी वर्गाही राज्यभरात चर्चेत आले. या भागात होणारी गैरकृत्ये, अमली पदार्थ व्यवसाय, मसाज पार्लर आदी व्यवसायांचे खरे रुप उघड झाले. यात पोलीस अधिकाऱयांसह व सरकारचे नावही काही प्रमाणात बदनाम झालेच. आता मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत सोनाली प्रकरण अखेर सीबीआयकडे सुपूर्द केले आहे. तरीही आता या ठिकाणी गब्बर झालेल्या पोलीस अधिकाऱयांची येथून बदली करण्यासाठी काही राजकीय नेत्यांनी विडा उचलल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
या भागातील पोलिसांची गैरकृत्ये, संशयित आरोपींना आशीर्वाद, आरोपींना व्हीआयपी पाहुणचार, महिनाकाठी कोटय़वधी रुपयांचा मलिदा, एका वरिष्ठ अधिकाऱयाचा मोठा विडा आदी विविध ठळक मुद्दय़ांसह वृत्त देऊन ‘तरुण भारत’ने ड्रग्स पॅडलरसह पोलिसांचेही कारनामे उघड केले होते. हीच संधी साधून एका बलाढय़ राजकारण्याला आपल्या हाताशी धरून दोन पोलीस निरीक्षकांनी व एका पोलीस उपअधीक्षकाने या ठिकाणी बदली मिळण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविल्याची खात्रीलायक वृत्त आहे. यातूनच ही पोलीस स्थानके किती फायद्याची आहेत हे स्पष्ट होते. सध्याचे पोलीस निरीक्षक प्रशल देसाई यांना कोणत्याही परिस्थितीत बाजूला करून आपण त्या जागी बसण्याचा एका अनुभवी निरीक्षकांनी प्रयत्न चालविला आहे. त्याच्याबरोबरच नव्यानेच बढती मिळालेल्या एका निरीक्षकाने आपल्या परीने आपले वजन लावल्याचे वृत्त आहे. यासाठी दोघांनीही लाखो रुपयांच्या घरात बोली लावल्याचे वृत्त खात्रीलायक सूत्रांकडून हाती आले आहे.
बदलीसाठी राजकीय वजन लावण्याचा प्रयत्न
विद्यमान निरीक्षक प्रशल देसाई हे दक्षिण गोव्यातील असून त्यांचेही तसे वजन आहे. त्यांना याच ठिकाणी ठेवण्यासाठी एका बलाढय़ राजकारणाने त्यांची भेट थेट गृहखात्याकडे केल्याचे वृत्त आहे. काही महिन्यांपूर्वीच म्हापसा येथे उपअधीक्षक पदाचा ताबा घेतलेले जिवबा दळवी यांनाही येथून हलविण्यासाठी जोरदार प्रत्न सुरू आहेत. अन्य ठिकाणी उपअधीक्षक पदावर कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिकाऱयाने आपले राजकीय वजन वापरून म्हापशात येण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविल्याचे वृत्त आहे. मात्र खात्यातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिवबा दळवी यांचे कनेक्शन थेट दिल्लीपर्यंत असल्याने तेही तितकेच वजनदार आहेत. या राजकीय खेळात कुणाचा बळी जातो, कोण बाजी मारतो, हे येत्या काही दिवसांत कळणार आहे.
पोलिसांची गैरकृत्य प्रकरणे प्रसारमाध्यमांनी धरली उचलून
गेल्या काही दिवसांपासून किनारपट्टी भागात गुह्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. खून, खुनीहल्ले, चोरी, आत्महत्या, मारहाण आदी प्रकरणात हणजूण पोलीस स्थानक बरेच गाजले आहे. त्यात सोनाली फोगट प्रकरण तर देशभर गाजले आहे. राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी तर पोलिसांची झोपच उडवून दिली. यापूर्वी विविध आरोप असलेले अधिकारी वर्गच सोनाली फोगट खून प्रकरण हाताळत आहेत, असे आरोपही स्थानिक तसेच राष्ट्रीय वृत्त वाहिन्यांनी ठळकपणे मांडल्याने पोलिसही बदनामीच्या झोतात आले. यासोबत राज्याचे नावही बदनाम झाले. असे असले तरी एकूण या प्रकरणावर मुख्यमंत्री कसा पडदा घालतात याकडे सर्वांना लक्ष द्यावे लागणार आहे. यातून कोणकोणत्या अधिकाऱयांना आपली खुर्ची बदलावी लागेल हे येणाऱया काळात दिसून येणार आहे.