गडहिंग्लजचे राजकारण ऐन पावसाळ्य़ात राजकीय नेत्यांची होणार तारांबळ
जगदीश पाटील/गडहिंग्लज
कोरोनामुळे लांबलेल्या निवडणुका जाहीर होण्याचा सपाटा विविध शासकीय खात्यांनी लावला आहे. नैसर्गिक परिस्थितीकडे दुर्लक्ष करत ऐन पावसाळय़ात सहकार खात्याने गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर केली आहे. कोसळणाऱया धो धो पावसात श्रावणात आता 14 ऑगस्टला मतदान होणार आहे. ऐन पावसाळय़ात निवडणुका होत असल्याने नेत्यांची मात्र मोठी तारांबळ उडणार आहे. तर पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांचीही धावपळ होणार आहे.
तालुक्यातील प्रमुख सत्तेचे केंद्र असणाऱ्या गडहिंग्लज कारखान्याची 19 जागांसाठी निवडणूक 14 ऑगस्टला होणार आहे. 11 ते 15 जुलै दरम्यान अर्ज भरणे, दाखल अर्जाची छाननी 18 जुलै रोजी आहे. माघारीची मुदत 2 ऑगस्ट पर्यंत आहे. 14 ऑगस्टला मतदान अन् मतमोजणी 16 ऑगस्टला होणार आहे. तशा हालचाली सुरु झाल्या आहेत. यापूर्वी गडहिंग्लज कारखान्याच्या सत्तेसाठी टोकाचे राजकीय संघर्ष अनुभवले आहेत. विचित्र आघाडय़ा या निवडणुकीत पहावयास मिळाल्या आहेत.
गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी, जनता दल आणि नलवडे गट यांनी आघाडी केली. त्याला डॉ. शहापूरकर, चव्हाण गटाने विरोध करत पॅनेल केले. यात आमदार मुश्रीफ, माजी आमदार शिंदे, संग्रामसिंह नलवडे यांची सत्ता आली. तसेच 12 संचालक निवडून आल्यानंतर अधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या असतानाही आमदार मुश्रीफ यांनी माजी आमदार शिंदे यांना चेअरमनपदावर बसवले. तर नलवडे व्हाईस चेअरमन झाले. यावेळी कारखाना ब्रिस्क कंपनी चालवत होती. शेवटच्या टप्प्यात आमदार मुश्रीफ आणि शिंदे यांच्यात फिस्कटल्यानंतर कंपनीने कारखाना सोडला.
हे ही वाचा : Kolhapur: ‘दादा’चे लाड, सत्ताधाऱ्यांचा विजयी चौकार
एवढय़ावरच राजकारण थांबले नाही. तर विरोधी संचालकांच्या मदतीने राष्ट्रवादीच्या काही संचालकांचा अपवाद वगळता 12 संचालकांनी राजीनामा दिल्याने चेअरमन शिंदे, व्हाईस चेअरमन नलवडे यांच्यावर नामुष्की आली. अखेर कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती झाली. त्यामुळे कारखान्याची लवकर निवडणूक होणार, हे स्पष्ट झाले होते.
कारखान्याच्या राजकीय हालचाली पाहता नेमकी आघाडी रचना सांगणे कठीण झाले आहे. अलिकडे राष्ट्रवादीतच आमदार मुश्रीफ आणि आमदार राजेश पाटील असे दोन गट पहावयास मिळतात. तर जनता दलाचे श्रीपतराव शिंदे यांची तयारी आहे. डॉ. प्रकाश शहापूरकर, प्रकाश चव्हाण यांनीही पॅनेल रचनेसाठी हालचाली चालवल्या आहेत. राज्यात सत्तांतर झाल्याने भाजपला कारखान्याची आस लागली आहे. डॉ. शहापूरकर, चव्हाण भाजपबरोबर असले तरी जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यात अधिक सक्रीय होतील, असे संकेत आहेत.
आमदार मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांचे विळ्य़ा-भोपळ्य़ाचे सख्य आहे. त्यामुळे त्यांची कारखान्यासाठीची भूमिका महत्त्वाची असेल, अशी चर्चा रंगत आहे. जनता दलाचे नेते शिंदे यांनी सातत्याने जातीयवादी पक्षाच्या संदर्भात असणारी वाटचाल पाहता ते त्या पक्षाशी संगत करतील, असे राजकीय जाणकारांना वाटत नाही. त्यामुळे जनता दलाचा हिरवा कंदिल कोणाला मिळणार, हे महत्त्वाचेच. कारखान्याच्या सत्तेसाठी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला एका जाजमावर जमवून घेण्याशिवाय पर्याय दिसत नाही. काँग्रेसची म्हणजेच नलवडे, कुराडे गटाची भूमिका लक्षात घ्यावी लागेल. सेवानिवृत्त कामगारांच्या एकजुटीची साऱयांना दखल घ्यावी लागेल, त्यांनीही लढण्याची तयारी दाखवली आहे. याशिवाय स्वाभिमानी, शिवसेना यासह अन्य पक्षांची, गटांची वाटचाल कशी राहते, हेसुध्दा पहावे लागणार आहे. सर्वच नेत्यांचा प्रवास पाहता पावसापेक्षा आघाडय़ांच्या रचनेची अधिक चर्चा होणार आहे. या चर्चा माघारीपर्यंत म्हणजे 2 ऑगस्टपर्यंत रंगणार आणि शेवटच्या टप्प्यात याचे ‘सोल्युशन’ निघणार, असे संकेत आहेत.
कारखाना निवडणूक कार्यक्रम
उमेदवारी अर्ज दाखल करणे- 11 ते 15 जुलै
उमेदवारी अर्जाची छाननी- 18 जुलै
उमेदवारी अर्ज माघार घेणे- 19 जुलै ते 2 ऑगस्ट
उमेदवारी चिन्हाचे वाटप- 3 ऑगस्ट
मतदान- 14 ऑगस्ट सकाळी 8 ते सायंकाळी 5
मतमोजणी- 16 ऑगस्ट
हे हा वाचा : आषाढी दिंडीला वारकऱ्यांचा महापूर; भरपावसात कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळ पायी दिंडी