ऑनलाईन टीम / मुंबई :
शिवसेनेच्या खासदार भावना गवळी (MP Bhavana Gawali) यांना पुन्हा एकदा ईडीने (ED) समन्स बजावलं आहे. त्यानुसार गवळी यांना पुढील आठवडय़ात चौकशीसाठी हजर रहावे लागणार आहे. चौकशीसाठी हजर न राहिल्यास ईडी गवळी यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने सप्टेंबर महिन्यात गवळी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले होते. त्यानंतर या प्रकरणात सईद खान या व्यक्तीला अटक केली होती. सईद खान यांच्या चौकशीत बाहेर आलेल्या माहितीच्या आधारे ईडीने गवळी यांना तीन वेळा समन्स बजावले होते. मात्र, गवळी एकदाही चौकशीला हजर राहिल्या नाहीत. आता पुन्हा एकदा ईडीने त्यांना समन्स बजावलं आहे. यावेळी गवळी चौकशीला हजर राहिल्या नाहीत तर त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्मयता वर्तवण्यात येत आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनाही गवळी यांच्यावर 100 कोटींच्या घोटाळय़ाचा आरोप केला आहे. भावना गवळींनी आपल्या बालाजी आर्टीकल फोर्ट कारखान्यासाठी दोन बँकांकडून 55 कोटींचे कर्ज घेतले आणि हा कारखाना आपल्याच बेनामी कंपनी असलेल्या भावना ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेडला केवळ 25 लाख रुपयांत विकला. त्यानंतर नवीन बेनामी कंपनीवर आखणी काही कोटी रुपयांचं कर्ज घेण्यात आलं. अशाप्रकारे गवळींनी 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता.