ऑनलाईन टीम/तरुण भारत
हिंदू धर्मगुरू शंकराचार्य स्वामी (Swaroopanand Saraswati) स्वरूपानंद सरस्वती यांचे रविवारी निधन झाले. वयाच्या ९९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील दिघोरी या छोट्याशा गावात एका ब्राम्हण कुटुंबात शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांचा जन्म झाला होता. हिंदू धर्माचे ते सर्वात मोठे (Religious leader) धर्मगुरु होते. जिल्हा नरसिंहपूर येथील परमहंसी गंगा आश्रमात रविवारी दुपारच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हिंदू धर्माबरोबरच त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातही मोठे योगदान राहिले होते. नुकताच त्यांचा ९९ वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. ते द्वारका आणि ज्योतिर्मठ या दोन मठांचे शंकराचार्य होते.
स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज हे करोडो सनातन हिंदूंच्या धर्माचे आधारस्तंभ आहेत. जगद्गुरू शंकराचार्य श्री स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी हे दोन मठांचे शंकराचार्य होते. स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचा जन्म मध्य प्रदेश राज्यातील सिवनी जिल्ह्यातील जबलपूरजवळील दिघोरी गावात एका ब्राह्मण कुटुंबात झाला होता. वयाच्या अवघ्या नऊव्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि धर्मप्रवास सुरू केला.
पंतप्रधान मोदींचे ट्वीट
शंकराचार्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे, “द्वारका शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झाले आहे. या दु:खाच्या काळात त्यांच्या अनुयायांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. ओम शांती.” असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. याशिवाय, गृहमंत्री अमित शाह, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.