ऑनलाईन टीम/तरुण भारत
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (navneet rana) आणि आमदार रवी राणा (ravi rana) यांनी हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरुन थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाच आव्हान दिलं होतं. मातोश्री बाहेर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असा इशारा दिला होता. पण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षत घेता राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी (mumbi police) अटक केली होती. आता जामिनासाठी राणा दाम्पत्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण आज नवनीत राणा यांना भायखळा कारागृहातून जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
राणा दाम्पत्याच्या अडचणी वाढणार
राणा दाम्पत्याचा अडचणी अजून वाढण्याची शक्यता आहे. कारण राणा यांच्या खारमधील घराची मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) तपासणी करणार आहे. तशी नोटीसच मुंबई महापालिकेकडून बजावण्यात आली आहे. घरात मंजूर आराखड्या व्यतिरिक्त अधिकचे बांधकाम, काही नियमांचे उल्लंघन केले असल्याच्या तक्रारीवरुन मुंबई महापालिकेनं तपासासाठी नोटीस पाठवली आहे.
राणा दाम्पत्याच्या जामिनावर आज निर्णय
२३ एप्रिलरोजी राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. २४ रोजी न्यायालयात हजर केलं असता कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तेव्हापासून राणा दाम्पत्य न्यायालयीन कोठडीत आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. कारण राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावरील निर्णय आज दिला जाणार आहे. वेळेअभावी मुंबई सत्र न्यायालयाने हा निर्णय राखून ठेवल्याचं सांगितलं होतं. राणा दाम्पत्याचे वकील रिझवान मर्चंट यांनी दिलेल्या माहितीनुसार कोर्ट दुसऱ्या प्रकरणांमध्ये व्यस्त होती. तरीही थोडा फार वेळ देत कोर्टानं निकाल वाचनास सुरुवात केली आहे. मात्र वेळेअभावी आज कोर्ट निकाल देऊ शकलं नाही. त्यामुळे आता या प्रकरणावर आज निर्णय येण्याची अपेक्षा आहे. आज निकाल वाचन होऊन निर्णय दिला जाईल. पहिल्या सत्रातच कोर्ट निकाल देईल, असं मर्चंट यांनी सांगितलं होतं.